आज व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. असं म्हणतात, प्रेम हे सांगून होत नसतं ते आपसूक होवून जातं. पण काहींचं प्रेम आणि त्यांची लव्हस्टोरी ही खूपच सुंदर असते. अशाच आपल्या काही लाडक्या कलाकारांच्या लव्हस्टोरी आहेत. तर चला जाणून घेऊया मराठी सिनेसृष्टीतील काही कलाकारांच्या लव्हस्टोरीज.
01
of 09
हार्दिक जोशी-अक्षया देवधर
हार्दिक आणि अक्षया यांची पहिली भेट ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या सेटवर झाली. या दोघांना खऱ्या आयुष्यात एकत्र आणण्यात हार्दिकच्या आईचा मोठा वाटा आहे. मालिका सुरु झाल्यानंतर वर्षाच्या आत हार्दिकच्या आईने अक्षयाला फोन करून विचारले की, “माझ्या मुलाशी लग्न करशील का?” पण त्या वेळेस त्यांच्यात काहीच नव्हते म्हणून हा विषय तिथेच संपला. मालिका संपल्यानंतर मात्र आईने हार्दिकला पुन्हा अक्षयाला लग्नासाठी विचारायला सांगितले. मैत्री तुटायला नको म्हणून हार्दिक सुरुवातीला नाही म्हणाला. पण आईच्या हट्टापुढे त्याने अक्षयाला विचारले आणि लगेच तिचा होकार सुद्धा आला आणि Reel Life नंतर Real Life मध्ये ‘हार्दिक-अक्षया’ पती-पत्नी झाले.
02
of 09
मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटे
प्रथमेश आणि मुग्धाची भेट ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्पमध्ये झाली. मुग्धा सर्वात लहान स्पर्धक होती, म्हणून ती प्रथमेशला दादा बोलायची. शो संपल्यानंतर संगीताच्या कार्यक्रमातून दोघे एकमेंकाना वरचेवर भेटत राहिले. त्यातून हळूहळू त्यांची मैत्री झाली. एक दिवस हिंमत करून प्रथमेशने मुग्धाला प्रपोज केलं. ३-४ दिवसांनी विचार करून मुग्धाने होकार दिला. ३-४ वर्षांच्या डेटनंतर दोघांनी घरी सांगितले. दोघांनी एकाच दिवशी, एकाच वेळेस आपापल्या घरी सांगितले. दोघांच्या घरातून होकार आल्यानंतर मुग्धा आणि प्रथमेश हे Little Champ आता Love Champ झाले अन् संसाराला लागले.
03
of 09
प्रसाद जवादे-अमृता देशमुख
प्रसाद अमृता यांची मैत्री बिग बॉस मराठीमध्ये झाली असली, तरी या दोघांनी ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत एक छोटा सीन केला होता. शूटिंगनंतर प्रसादने अमृताला तिच्या घरी सोडले. त्यानंतर त्यांची थेट भेट झाली ती बिग बॉसच्या मंचावर. तिथे अमृताला पाहून प्रसाद खूप खुश झाला, इतर सदस्यांसोबत भांडता भांडता दोघे एकमेंकाच्या नकळत जवळ आले. पहिल्याच आठवड्यात प्रसादला अमृता आवडू लागली आणि त्याने तिला त्याच घरात प्रपोज केले. मात्र अमृताला बिग बॉसच्या घरात कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता. म्हणून शोमधून बाहेर पडल्यावर दोघे एकमेंकाना वेळ देऊ लागले. त्यांचं प्रेम प्रत्येक भेटीनंतर वाढत गेले आणि आता त्यांनी लग्नगाठ देखील बांधली. अशा प्रकारे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडून संसार थाटणारे हे पहिलं जोडपं ठरलं.
04
of 09
सिध्दार्थ चांदेकर-मिताली मयेकर
२०१७ साली एका कार्यक्रमात फारच औपचारिकरित्या सिद्धार्थ आणि मितालीची पहिली भेट झाली. नंतर ते इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करून गप्पा मारू लागले. २-३ महिन्यांच्या गप्पानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले आणि मग हळू हळू त्यांच्यात प्रेमाची कळी उमलू लागली. रिलेशनशिपच्या काही महिन्यांनंतर दोघेही एकत्र राहू लागले. एक वर्ष एकत्र राहिल्यानंतर सिद्धार्थने मितालीला तिच्या वाढदिवशी लग्नासाठी विचारले. मितालीने लगेचच होकार दिला आणि दोघांनी लग्नगाठ बांधली.
05
of 09
अजिंक्य ननावरे-शिवानी सुर्वे
‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत अजिंक्य आणि शिवानीची पहिली भेट झाली. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये मैत्री झाली. २०१६ साली दोघांच्या नात्याला सुरुवात झाली. एक वर्षातच घरी सांगितल्यावर घरातून त्यांच्या नात्याला विरोध झाला. तुमचं हे आकर्षण नसून प्रेम आहे, तर आम्हाला एकत्र राहून दाखवा, असे घरातले बोलल्यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. लाॅकडाऊनमध्ये एकत्र राहिल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या घरच्यांनी होकार दिला. ८ वर्ष डेट केल्यानंतर दोघेही विवाहबद्ध झाले.
06
of 09
स्वानंदी टिकेकर-आशिष कुलकर्णी
आशिष आणि स्वानंदीची पहिली भेट ही जुईच्या वाढदिवसाला तिच्या घरी झाली. स्वानंदी ही आशिषची क्रश होती आणि तिला पहिल्यांदा भेटल्यावर ‘एक नजर में भी प्यार होता है’ हे आशिषच्या बाबतीत खरं ठरलं. त्या भेटीत दोघांना कळलं की दोघे एकमेंकापासून फक्त ३ मिनिटांच्या अंतरावर राहतात. तेव्हा त्यांनी एकमेंकाना नंबर दिले. भेटीनंतर तिसऱ्या दिवशी स्वानंदीने आशिषला दुपारी घरी जेवायला बोलवले. तेव्हा बोलता-बोलता आशिषने तिला लग्नासाठी विचारले आणि त्यावर स्वानंदी हो म्हणाली. दोघांना एकमेंकाना जाणून घेण्याची इतकी इच्छा होती की काही महिन्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. दरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले अन् पहिल्याच नजरेत आशिषने पाहिलेलं लग्नाचं स्वप्न वर्षभरातच पूर्ण झालं.
07
of 09
विराजस कुलकर्णी-शिवानी रांगोळे
शिवानी आणि विराजस एका नाटक संस्थेत एकमेंकाना पहिल्यांदा भेटले. तेव्हा शिवानी दहावीला तर विराजस अकरावीला होता. एकाच संस्थेत असल्यामुळे करिअरमध्ये दोघे एकमेकांना नेहमीच सल्ला द्यायचे. त्या दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. सुरुवातीच्या काळात विराजस शिवानीचा क्रश होता. ग्रुपमध्ये त्यांना एकमेंकांच्या नावाने चिडवायचे. मग काही वर्षांनी जेव्हा विराजसला शिवानी आवडायला लागली, तेव्हा त्याने तिला प्रपोज केलं. २०१९ मध्ये दोघांनी लग्न करायचे ठरवले. १० वर्ष मैत्री, नात्यातील चढ-उतार, प्रेम हे सगळं एकत्र पाहिल्यानंतर दोघांनी अग्नीच्या साक्षीने लग्न केले.
08
of 09
प्रथमेश परब-क्षितिजा घोसाळकर
प्रथमेश आणि क्षितिजाची ओळख इंस्टाग्रामवर झाली. ‘गुंतता हृद्य हे’ अशी थीम घेऊन क्षितिजाने व्हॅलेंटाईन सिरीज केली होती. त्यावेळेस ते वाचून आणि फोटोज बघून प्रथमेशने ‘खूप छान लिहिते’ असा मेसेज केला. तेव्हापासून दोघे एकमेंकाशी बोलू लागले. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यांची पहिली भेट टाईमपास ३ शूटिंगच्या दरम्यान ठाण्यात झाली. त्यानंतर दोघांच्या मैत्रीने प्रेमाचे वळण घेतले आणि त्यांच्यात प्रेमाचे वारे वाहू लागले. ३ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर आता लग्नाच्या नात्यात दगडू आणि प्राजू बांधले जाणार आहेत.
09
of 09
हृता दुर्गुळे-प्रतिक शहा
हृता आणि प्रतिकची ओळख प्रतिकच्या आईमुळे झाली. प्रतिकची आई म्हणजेच मुग्धा आणि हृता यांनी दुर्वा या मालिकेत एकत्र काम केले होते. या मालिकेमुळे त्यांच्यात चांगली ओळख झाली. हृताचे मुग्धा यांच्या घरी येणे जाणे होते म्हणून तिची प्रतिक सोबतही चांगली ओळख झाली. त्याचदरम्यान त्यांच्या भेटी वाढल्या. काही वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी मुग्धा यांना सांगायचे ठरवले. मुग्धा यांना हृता आधीपासूनच आवडत होती, म्हणून त्यांनी लगेचच त्यांच्या नात्याला होकार दिला. आणि ऑन स्क्रीन असलेली आई-लेकीची जोडी खऱ्या आयुष्यात सासू-सून झाल्या.