नेहमीप्रमाणे ‘बिग बॉस १७’ (Big Boss 17) देखील चांगलेच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात सतत ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळत असतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून घरातील चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले होते. दर आठवड्याला बिग बॉसच्या घरात काही ना काही राडा पहायला मिळतो. यावेळीही काही वेगळी परिस्थिती नाही, उलट आता तर घरातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिषेक, ईशा आणि समर्थ यांच्यात जोरदार भांडण होताना दिसत होते. यातच समर्थने वारंवार अभिषेकच्या मानसिक स्थितीवर भाष्य करत त्याला त्रास दिला होता. अभिषेकने समर्थच्या कानाखाली मारल्याचे देखील एपिसोडमध्ये दाखवण्यात आले होते.
ईशा मालविय आणि समर्थ जुरैल हे अभिषेकच्या मानसिक स्थितिवरून खिल्ली उडवतात. भूतकाळात अभिषेकला मानसिक स्वास्थ्याशी संबंधित समस्या होत्या. त्यावरून ईशा व समर्थने अभिषेकला डिवचण्याचा प्रयत्न केला असून ईशा अभिषेकला ‘मेंटल भोपू’ म्हणून चिडवते. त्यावर अभिषेक तिला उत्तर देतो, “तुझ्या प्रेमातच मी वेडा होतो. तू मला वेडा करून सोडलंस.” पुढे ईशा अभिषेकच्या वडिलांवरून कमेंट करत म्हणते की, “तुझ्या वडिलांनाही माहीत आहे की तू लहानपणापासूनच वेडा आहेस. सर्वांना माहीत आहे की तू वेडा आहेस.” आणि त्या तिघांमधील भांडण इतकं वाढलं की रागाच्या भरात अभिषेकने समर्थच्या कानाखाली मारली.
आत्ता बिग बॉसच्या घरातील अभिषेकचा प्रवास संपला आहे. कमी वोट मिळाल्यामुळे नाही तर अंकिता लोखंडेने अभिषेक कुमारला या कार्यक्रमातून काढले आहे. अंकिताने बिग बॉसच्या घरातून मिळालेल्या अधिकाराचा वापर केला असून अभिषेकला बाहेरचा रास्ता दाखवला. अंकिता घराची कॅप्टन असल्याने निर्णय घेण्याची जबाबदारी बिग बॉसने अंकितावर सोपवली.
अभिषेक कुमारला बाहेर काढल्यापासून त्याचे चाहते संतापले होते. त्याने अभिषेकला शोमध्ये परत आणण्याची मागणी तर केलीच पण त्याला भडकवल्याबद्दल समर्थ जुरैल आणि ईशा मालवीय यांनाही फटकारले. मात्र आता या सर्व गोष्टींमुळे या शोचा होस्ट सलमान खान चांगलाच भडकलेला दिसला. ‘वीकेंड का वार’मध्ये या मुद्यावरून त्याने घरातल्यांची चांगलीच कानउघडणी केली. सलमान येताच त्याने ईशा आणि समर्थला कडक शब्दात सुनावले होते.
दरम्यान, आता यानंतर बिग बॉसच्या घरात अभिषेक कधी परत येणार की घरात नवे कोणते वळण येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.