आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक कलाकार प्रेक्षकांची मने जिंकून घेतात. तर काही कलाकार त्यांच्या वेगळेपणाने त्यांच्या चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण करतात. तर अशीच एक मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री म्हणजे ‘सई ताम्हणकर’ (Sai Tamhankar). मराठी सिनेसृष्टीत सईने स्वतःची एक वेगळीच आणि खास ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील प्रचंड मोठा आहे.
सर्वांची लाडकी सई अनेकदा वेगवेगळ्या मुलाखतीतून देखील चर्चेत येते. त्यावेळी सई तिच्या स्वभावाप्रमाणे खूपच स्पष्टपणे तिचे मत मांडत असते. सईने नुकतीच एक मुलाखत दिली तेव्हा तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. तर चला पाहूया कोणत्या प्रश्नाला तिने कोणती उत्तरे दिली आहेत.
‘बोल्ड, बिनधास्त, ब्युटीफुल’ ही तुझी ओळख बनली आहे. या प्रवासात नेमकी कोणती आव्हानं समोर होती?
“मी केलेले कष्ट आठवतात, अवघड प्रसंग आठवतात! कधी-कधी असेही दिवस होते जेव्हा; पडल्यानंतर प्रोत्साहन देणारेही तुम्ही स्वतःच असता. तो एकटेपणाही आठवतो. परंतु, आज या कष्टांचं फळ मिळाल्यानंतर एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. मनात अनेकदा नकारात्मक विचारही आले; पण माझ्या मनानेच मला उभारी दिली. मी प्रत्येक क्षण जगणारी मुलगी आहे. आज जेव्हा कोणी म्हणतं की, ‘मला सईसारखं काम करायचंय’ तेव्हा माझी जबाबदारी अधिकच वाढते. मी नेहमीच मनानं व्यक्त होते. हे ‘यश’ किंवा आजचं माझ्या नावाभोवतीचं वलय एका रात्रीत मिळालेलं नाही. तुम्हाला अतिशय कष्ट करावे लागतात. ‘कीप युअर हेड डाऊन अँड कीप वर्किंग’ हे माझं ब्रीदवाक्य आहे. इतक्या वर्षांनंतर मला आत्ता कुठे स्थिरावल्यासारखं वाटतंय. त्याचं समाधान आहे, परंतु या समाधानामागे अपार कष्ट आणि कणखर हृदयही आहे. ‘यश’ आणि ‘अपयश’ पचवणं ही काही सोपी गोष्ट नाही.”
View this post on Instagram
हिंदी आणि मराठी मनोरंजनसृष्टी दोन्हीमध्ये योग्य संतुलन राखत तू काम करतेस. कामाची निवड करताना तुझे निकष काय असतात?
“हे निकष तुमच्या मनस्थितीप्रमाणे, करिअरच्या प्रवासाप्रमाणे, तुमच्या परिस्थितीप्रमाणे बदलत असतात. निवडीबाबतचं विशेष समीकरण माझ्याकडे तरी नाही. तुमचे निकष कायमच बदलत जातात. माझा कल हा यापूर्वी न केलेल्या कामाकडे असतो. मी आधी अशी दिसली नाहीय, जे पात्र मी केलेलं नाहीय; ते मला आकर्षित करतं. सुदैवाने गतवर्षांत सर्वार्थाने विविधांगी भूमिका माझ्याकडे आल्या आणि त्या मी प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर सादर केल्या.”
तुझ्यातील रेनेसॉन्स.. नवनिर्मिती; तू कशी कायम राखते?
“’रेनेसॉन्स’ ही संकल्पना मला विशेष आकर्षित करते. नजीकच्या वर्षात माझ्याकडून ‘धुरळा’, ‘मीडीयम स्पायसी’, ‘मिमी’, ‘पाँडिचेरी’, ‘इंडिया लॉकडाऊन’, ‘बी.ई. रोजगार’, ‘पेट पुराण’, ‘नवरसा’, ‘समांतर २’ यासारखी वैविध्यपूर्ण कामं झाली; याचा आनंद आहे. उद्या मी जरी नसेन, तरी माझं काम कायम जिवंत राहायला हवं. आणि त्यासाठी सचोटीने या जन्मात मी काम केलं तरच ते शक्य होईल. मला अनेकदा असं वाटतं की, जेव्हा कुणी नवीन गोष्टीचा दरवाजा उघडतो, तेव्हा तो त्या एकट्या व्यक्तीसाठी नसतो. त्यामागून येणाऱ्या इतर कष्टकरी आणि प्रगल्भ व्यक्तींसाठीही असतो. असे अनेक नवीन दरवाजे मला उघडायचे आहेत. जी नवी पिढी मराठी मनोरंजनसृष्टीत येईल त्यांच्यासाठी काही दरवाजे मला कायमचे उघडे करायचे आहेत; जेणेकरून ते अधिक पुढचा पल्ला गाठू शकतील.”
मागील वर्षात तू खूप विविधांगी भूमिका साकारल्या. परंतु, काही निवडक लोकांकडून मिळालेली शाबासकी वगळता अनेकांनी तुझ्या गुणवत्तेकडे, प्रगल्भतेकडे कानाडोळाच केला..असं तुला वाटतं का? तू त्यांना काय सांगशील?
“मला त्यांना सांगायचंय की, ‘कोण हरतंय बघू या? तुम्ही का मी? कारण, कानाडोळा करणं हे अगोदरपासूनच आहे; हे माझ्यासाठी नवीन नाही. मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे; हे जोवर मला माहितीय तोवर मला इतर कोणीही माझ्या यशापासून दूर सारू शकत नाही. माझा प्रामाणिकपणा, माझी मेहनत, माझा अजेंडा तुम्ही माझ्यापासून हिरावू शकत नाही. मी तुम्हाला सतत सिद्ध करून दाखवणारच. एके दिवशी तुम्हाला माझी, माझ्या कामाची प्रशंसा करावीच लागेल. ‘दुनियादारी’ सिनेमानंतर मला अनेकांचे फोन आले, लोकं भेटली. ज्यांना मी पूर्वी आवडायचे नाही, मी केवळ एक ‘ग्लॅम डॉल’ दिसायचे, त्यांचं मतपरिवर्तन मी माझ्या कामातून तेव्हा केलंच होतं. दहा वर्षांनंतर का होईना पण, ‘बी.ई.रोजगार’च्या निमित्तानं पुन्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. तर ‘यु कॅन लव्ह मी ऑर हेट मी.. बट यु कान्ट इग्नॉर मी’”
नवीन वर्षात कोणती महत्त्वाकांक्षी भूमिका साकारायचीय?
“माझ्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षात प्रत्येक स्क्रीनवर मी विविधांगी काम करताना दिसेन. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट..वेब सीरिज आणि टेलिव्हीजनवरही मी असणारच आहे. माध्यम कोणतंही असो; सातत्यानं काम करत राहायचंय. वर म्हटल्याप्रमाणे, प्रत्येकवेळी नवीन ‘सई’ तुम्हाला दिसेल. काही चरित्रभूमिका मला साकारायच्या आहेत. त्यासाठीची तयारी मी करतेय. एक भूमिका मला प्रचंड खुणावतेय ती म्हणजे; सावित्रीबाई फुले. त्यांचा चरित्रपट करायला मला आवडेल.”
मनोरंजनसृष्टीतील इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर तुला काय सांगावंसं वाटेल?
“आपल्याकडे महिला दिग्दर्शक खूप कमी आहेत. मला अधिक महिला दिग्दर्शकांसोबत काम करायचं आहे. नवोदित दिग्दर्शिका आपल्या मनोरंजनसृष्टीत यायला हव्यात. त्यांना काम करण्यासाठी पोषक वातावरण मिळेल; याची ग्वाही मी किंवा माझ्यासोबतच इतर अभिनेत्री आणि अभिनेतेदेखील देतील; असा मला विश्वास आहे. ‘ती’च्या नजरेतील गोष्ट पडद्यावर यायला हवी.”
अन्य भाषेत काम करताना आपल्या प्रेक्षकांचा पाठिंबा हवा असे तिचे म्हणणे आहे. त्यावर ती म्हणाली की, “प्रेक्षकांनी आपली दृष्टी सकारात्मक करायला हवी. मराठी कलाकार जेव्हा उंबरठा ओलांडून वेगळ्या भाषेतील मनोरंजनसृष्टीत काम करतो, तेव्हा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहा. त्याला प्रोत्साहन द्या. याकडे सकारात्मकतेने बघा. माझी मातृभाषा माझ्याकडून कुणीही हिरावून घेणार नाही. त्यासोबतच इतर भाषांमध्ये काम करताना तिथली भाषा आत्मसात करणं हेही माझं कर्तव्य आहे. तेव्हा अशा कलाकारांना ट्रोल करून चालणार नाही. काहीही झालं तरी मराठी सिनेमे करणं मी सोडणार नाही. प्रेक्षकांनी आम्हाला निर्धास्तपणे काम करू द्यावं.”
सईचा ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा आगामी सिनेमा येत्या २ फेब्रुवारी २०२४ रोजी सिनेमागृहात झळकणार आहे. त्यामुळे सईचे चाहते तिच्या या सिनेमासाठी भारीच उत्सुक आहेत.