मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेविश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वत:ची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या काही खास गोष्टी.
विक्रम गोखले यांनी वयाच्या २६ व्या वर्षापासून अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ‘कळत नकळत’, ‘वजीर’, ‘माहेरची साडी’, ‘महानंदा’, ‘लपंडाव’ अशा एकाहून एक मराठी चित्रपटांमधून विक्रम गोखलेंनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. ‘कळत नकळत’ या नाटकातील ‘देव कुणीच नसतो…’ त्यांनी बोललेला हा संवाद खूपच लोकप्रिय झाला होता. तसेच त्यांनी मराठी व हिंदी सिनेमात देखील आपल्या अभिनयाची छाप उमटवली. त्यांनी अनेक लोकप्रिय सिनेमानमध्ये काम केले.
मात्र काही कारणांमुळे विक्रम गोखले यांनी जवळपास सात वर्ष सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला होता. त्याचे कारण देखील त्यांनी एक मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितले होते. ते म्हणाले होते की, “मला या सृष्टीत राहायचं नाही हे सांगून, पूर्वसूचना देऊन मी गेलो होतो. मी सात वर्षे शेती करत होतो. ६ मे १९८२ ते २ मार्च १९८९ या कालावधीत मी काम करणं सोडून दिलं होतं. कारण प्रत्येक माणूस जो संसार चालवतो, उपजिवीका चालवतो आहे. त्या व्यवसायात जर त्याच्या कर्तृत्वाला वाव नसेल, ठरलेले पैसे वेळेवर मिळत नसतील. घामाचे पैसे मागण्यासाठी हात पसरावे लागत असतील तर मी या क्षेत्रात का राहायचं हा प्रश्न निर्माण झाला होता. अर्थशास्त्र, व्यवहार आणि कला यांची नीट सांगड घालता येत नसेल तर काय करणार? मी त्यामुळेचं तो निर्णय घेतला. माझं काहीही अडत नाही. मी कामाला नाही म्हणू शकतो अशी क्षमता जेव्हा माझ्यात आली तेव्हा मी या सृष्टीत परतलो.” असं विक्रम गोखलेंनी सांगितलं होतं.
View this post on Instagram
विक्रम गोखले कायम स्पष्टपणे आपलं मत मांडत असतं. एकदा ते म्हणाले होते की, “काशीनाथ घाणेकर यांना आम्ही कुणीही अभिनेता मानत नाही. सुपरस्टार तर सोडूनच द्या. काशीनाथ घाणेकरांवर प्रेम करणारे जे असंख्य लोक आहेत ज्यांनी काशीनाथ घाणेकरांना आणि काशीनाथ घाणेकर केलं हे सगळे माझ्यावर टीका करतील पण मला त्याची पर्वा नाही. मी जे माझ्या अभिनय शाळेत शिकलो ते माझ्यासाठी आदर्श आहे. मला, विक्रम गोखले हा थर्ड क्लास अभिनेता आहे असंही कुणी म्हटलं तरीही हरकत नाही, पण मी काशीनाथ घाणेकरांना अभिनेता मानणार नाही. कारण अभिनयाच्या नावाखाली घाणेकर जे काही करत होते ते अभिनयाच्या व्याख्येत बसणारं नाही.”
तसेच शेवटी ते म्हणाले होते की, “यशस्वी होणं आणि अभिनय करता येणं हे दोन वेगळे भाग आहेत. शिक्षण आणि शहाणपण या दोन वेगळ्या गोष्टी असतात. तसंच एक यशस्वी अभिनेता आणि उत्तम अभिनेता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मला काशीनाथ घाणेकर यांच्याविषयी काहीही मत्सर नाही. मात्र जे माझं मत आहे ते मी बदलणार नाही. काशीनाथ घाणेकर या सिनेमात सुबोध भावेने खूप चांगलं काम केलं आहे.” ते काम जर काशीनाथ घाणेकर यांनी काम केलं असतं तर वाईट केलं असतं असंही परखड मत विक्रम गोखले यांनी मांडलं होतं.
रंगभूमी, सिनेमा आणि मालिकेतील हरहुन्नरी दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांना जन्मदिवसानिमित्त मानाचा मुजरा.