बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला असता मिळणाऱ्या भल्यामोठ्या यादीतील पहिलं नाव म्हणजे ‘माधुरी दीक्षित’ (Madhuri Dixit). माधुरी धकधक गर्ल म्हणून भारतातच काय तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. हिंदी सिनेसृष्टीत तिने काहीच क्षणांत अढळ स्थान निर्माण केले. माधुरीने सिनेसृष्टीतील ९० वे शतक अक्षरशः तिच्या नावे केलं होतं. तर २०१८ सालच्या ‘बकेट लिस्ट’ या मराठी सिनेमातून माधुरीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.
माधुरीने आपल्या दमदार अभिनयासोबतच आपल्या उत्कृष्ट नृत्याने कायमच तिच्या चाहात्यांना मंत्रमुग्ध केलं. पण आता अभिनयानंतर माधुरी नुकतीच निर्मितीकडे वळली आहे. यापूर्वी माधुरीने ‘१५ ऑगस्ट’ या सिनेमाची निर्मिती केली. तर आता पुन्हा एकदा ती निर्मातीच्या रुपात आपल्या सर्वांसमोर येणार आहे. माधुरी दीक्षित निर्मित ‘पंचक’ हा आगामी सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे ५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे शूटिंग कोकणातील सावंतवाडी झाले. अन् यादरम्यान माधुरीने काही मुलाखती दिल्या. त्यावेळी तिने अनेक बालपणीच्या आणि कुटुंबासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कोकणातील पूर्वीच्या अनुभवाबद्दल विचारलं असता माधुरी म्हणाली की, “माझी आजी-पणजी सगळे कोकणामध्ये होते. त्यामुळे आम्ही लहानपणी त्यांना भेटायला कोकणात जायचो. माझ्याबरोबर माझी चुलत भावंडं सुद्धा गावी यायची. झाडावर चढायचं, आंबे खायचे या सगळ्या गोष्टी मी अनुभवल्या आहेत. आम्हा सगळ्या भावंडांचं वय तेव्हा ८ ते ९ वर्ष होतं. त्यावेळी आमच्या गावी एक मोठा झोका होता. त्यावर आम्ही खेळत बसायचो.”
तसेच माधुरीने आजोबांबद्दलची एक आठवण सांगितली. तेव्हा ती म्हणाली की, “आमचे आजोबा खूप कडक शिस्तीचे होते. त्यामुळे त्यांचा आवाज ऐकला की आम्ही सगळे पळून जायचो. त्यांना बघून पळून जाण्याचं कारण म्हणजे, आजोबा आल्यावर आम्हाला सगळ्यांना कामाला लावायचे. हे काय झोके घेत बसलात! चला शेण सारवायला लागा असं सांगायचे. माझे आजोबा सगळ्यांकडून अंगणात शेण सारवून घ्यायचे. आमच्या रत्नागिरीच्या घरी शेणाने सारवलेलं अंगण होतं. त्यामुळे पाणी शिंपडून व्यवस्थित सगळं करावं लागायचं. आजोबांना आम्ही सगळीच भावंडं खूप घाबरायचो. त्यामुळे ही सगळी कामं करायचो.”
सध्या माधुरीसह तिचे पती डॉ. श्रीराम नेने देखील कोकणातच आहेत. त्यामुळे ते देखील या मुलाखतीत सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या कोकणातील आठवणी सांगितल्या. तेव्हा नेने म्हणाले की, “आम्ही दरवर्षी दिवेआगारला जायचो. बैलगाडी, कोकणातील विविध पदार्थ, भात, आंबे ही सगळी धमाल आम्ही केली आहे. तेव्हा मी ७-८ वर्षांचा होतो. आम्ही एसटी बसने गावी जायचो. अशा खूप आठवणी आहेत.”
माधुरी दीक्षितसह डॉ. श्रीराम नेने देखील ‘पंचक’ या सिनेमाची निर्मिती करत आहेत. त्यांच्या या आगामी सिनेमामध्ये आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, तेजश्री प्रधान, आनंद इंगळे, सतीश आळेकर, भारती आचरेकर, आरती वडगबाळकर, नंदिता पाटकर, गणेश मयेकर, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आशिष कुलकर्णी हे कलाकार झळकणार आहेत.