तो आला, त्याने पाहिले त्याने जिंकले! सत्तरच्या दशकातला हा काळ. सुपरस्टार असताना सलग १६ सिल्वर ज्युबिली सुपरहिट सिनेमे देण्याचा विक्रम आजही या कलाकाराच्या नावावर आहे. तो म्हणजे बॉलीवूड चा पहिला वहिला सुपरस्टार राजेश खन्ना.
बॉलिवूडचा पहिला भारतीय सुपरस्टार म्हणून ओळखले जाणारे राजेश खन्ना म्हणजेच काका. यांचे खरे नाव जतीन खन्ना, यांचा आज जन्मदिवस.असे म्हणायला हरकत नाही की सिनेसृष्टीच्या इतिहासात क्वचितच त्यांच्या सारखी लोकप्रियता कोणाला लाभली असेल.
अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळाल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्या काळातील तरुणींना बरेच आकर्षण होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल बरीच चर्चा रंगलेली असायची. अभिनेत्री अंजू महेंद्रसोबतचे त्यांचे ८ वर्षांचे प्रेमप्रकरण सर्वांनाच माहित होते. परंतु १९७३ मध्ये ते डिंपल कपाडियासोबत लग्नबंधनात अडकले. याबद्दलची सर्वात मोठी चर्चेतील गोष्ट म्हणजे लग्नाच्या ठिकाणी जात असताना ते त्याच रस्त्यावरून गेले जेथे अंजू महेंद्र राहत होती.
राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी “आखरी खत” या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तर ‘आखरी खत’ हा त्यांचा पहिला चित्रपट ऑस्करसाठी नामांकित झाला आणि अंतिम पाचपर्यंत पोहचला होता. राजेश खन्ना यांनी सिनेसृष्टीतील ४५ वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास १८० चित्रपटांमध्ये काम केले असून ते सुरुवातीच्या ३ दशकांमध्ये ते फक्त २० चित्रपटांमध्ये दिसले. राजेश खन्ना यांनी त्यांच्या या कारकिर्दीत राज, आराधना, धर्म और कानून, कुदरत, सच्चा झूठा, हमशकल, हम दोनो, उंचे लोग, मेहबूबा, भोला भला, दर्द आणि महाचोर या तब्बल १२ सिनेमांमध्ये दुहेरी भूमिका साकारली होती.
तर अभिनेत्री मुमताज सोबतचे त्यांनी अभिनय केलेले सर्वच चित्रपट हे ब्लॉकबस्टर ठरले होते. मुमताज सोबत केलेल्या रोटी या सिनेमात त्यांना मुमताजला तब्ब्ल ८ वेळा खांद्यावर उचलून घ्याव लागलं होत. आणि हाच सीन रोटी सिनेमाच्या पोस्टरवर सुद्धा झळकला होता.
तसेच त्यांनी १९६९ ते १९७२ या काळात आराधना, इत्तेफाक, दो रास्ते, बंधन, डोली, सफर, खामोशी, कटी पतंग, आं मिलो सजना, द ट्रेन, आनंद, सच्चा झूठा, दुश्मन, मेहबूब की मेहंदी, हाथी मेरे साथी सारखे सलग १६ सुपरहिट चित्रपट दिले. राजेश खन्ना यांना अखिल भारतीय समीक्षक पुरस्कारासाठी दहा वेळा नामांकन मिळाले होते आणि त्यांना सात वेळा पुरस्कार मिळाला. तर फिल्मफेअर पुरस्कारासाठी चौदा वेळा आणि बंगाल फिल्म पत्रकार पुरस्कारासाठी पंचवीस वेळा नामांकन मिळाले होते. दोन्ही पुरस्कारांसाठी एकूण एकोणचाळीस नामांकनांमध्ये त्यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार आणि चार वेळा बंगाल फिल्म पत्रकार पुरस्कार मिळाला. तसेच ते राजकारणातही बरेच कार्यरत होते.
त्यांचा अभिनय, त्यांची शैली यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. त्या काळात तरुणींमध्ये ते फार प्रसिद्ध होते. तरुणी स्वतःच्या रक्ताने त्यांना पत्र लिहायच्या. त्यांच्या फोटो सोबत असंख्य तरुणींनी लग्न सुद्धा लावले होते. त्यांची कार तरुणींच्या लिपस्टिकच्या खुणांनी भरून जायची. एकदा त्यांना ताप असताना त्यांच्या फोटोवर तरुणींनी पाणी शिंपडून त्यांचा ताप कमी व्हावा यासाठी प्रार्थना केली होती.
सुपरहिट कारकीर्द, मानसन्मान, प्रेक्षकांचे प्रेम लाभलेल्या या ब्लॉकबस्टर अभिनेत्याची वयाच्या ६९ व्या वर्षी कर्करोगामुळे प्राणज्योत मालवली.
अशा या सुपरस्टारला मानाचा मुजरा….