सीमेपार लढलेल्या महाराष्ट्राच्या मातीतील योध्यांची धगधगती विजयगाथा लवकरच ‘बलोच’ या सिनेमातून उलगडणार आहे. पानिपतच्या युध्दात झालेल्या पराभवामुळे स्विकारावी लागलेली परक्यांची गुलामगिरी आणि त्यावेळचे हे भयाण चित्र आता प्रेक्षकांसमोर येणार आहे.
काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला अन् तो ट्रेलर पाहून अक्षरशः प्रत्येकाच्याच अंगावर चटकन् शहारा आला. ट्रेलर पाहूनच हृदयाचा ठोका चुकला आहे. त्यामुळे सिनेमासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच ताणली आहे. त्यावरून या सिनेमाचे शूटिंग मात्र वाटते तेवढे सोपे नक्कीच नाही, याची प्रचिती ही आली.
बलोच हा सिनेमा येत्या ५ मे रोजी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये पाहायला मिळणार आहे. अर्थातच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याकाळच्या या वास्तवाची जाणीव आजही तेवढ्याच तीव्रतेने व्हावी यासाठी या सिनेमाचे शूटिंग खूपच विचारपूर्वक केले आहे, मग त्यामध्ये कलाकारांचा पोशाख, मेकअप पासून अनेक गोष्टी खऱ्याखुऱ्या भासवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे.
या सिनेमाचे शूटिंग हे जैसलमेरच्या रखरखत्या उन्हात पार पडले असून त्यावेळी दिवसा तेथील तापमान ५० डिग्री तर रात्रीचे तापमान ९ ते १० डिग्रीपर्यंत असायचे. अशा या सातत्याने बदलत जाणाऱ्या वातावरणात आणि आणखी अनेक अडचणींचा सामना करत हे शूटिंग पूर्ण झाले आहे.
तर सध्या या सिनेमाच्या निमित्ताने या सिनेमाचे कलाकार आणि टीम अनेक मुलाखती देताना दिसत आहेत. या दरम्यान शूटिंगच्या अनुभवाबद्दल प्रवीण तरडे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील ४० डिग्री तापमानात आपली अवस्था खराब होते. तिथे ५० डिग्री तापमानात आम्ही चित्रीकरण केले. या रखरखत्या उन्हात चित्रीकरण करणे आमच्यासाठी खूप आव्हानात्मक होते. आमची ४०-५० जणांची टीम होती. सीन चित्रित झाल्यावर आम्ही तंबूत जायचो, मात्र तिथेही उन्हाच्या झळा यायच्या. आम्हाला भीती होती की, चित्रीकरणादरम्यान काही शारीरिक अडचणी येऊ नयेत आणि सुदैवानं असं काहीही झालं नाही.”
तसेच ते पुढे म्हणाले की, ”सगळं सुरळीत पार पडलं. एक मात्र आवर्जून सांगावसं वाटतं, ते म्हणजे या रखरखत्या उन्हात मराठे कसे लढले असतील, याचा अंदाज आम्हाला इथे आला. खरंतर पानिपतचे युद्ध हा मराठ्यांचा पराभव नसून ही मराठ्यांची विजयगाथा आहे आणि हेच आम्हाला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे.”
या सिनेमात अभिनेता प्रवीण तरडे, अमोल कागणे आणि अभिनेत्री स्मिता गोंदकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे आता या सिनेमाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.