मराठी कलाविश्वातील आघाडीचा अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून ‘प्रसाद ओक’ला ओळखले जाते. त्यामुळे प्रसाद ओक सध्या चांगलाच चर्चेत असतो.
आत्तापर्यंत त्याने दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. हिरकणी,चंद्रमुखी यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळे तो एक उत्तम दिग्दर्शक असल्याचे देखील सिद्ध झाले. प्रसाद ओक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो.
‘धर्मवीर’ चित्रपटामध्ये प्रसादने साकारलेली आनंद दिघे ह्यांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीचं पसंतीस उतरली. प्रसादने नुकतेच सोशल मीडियावर दोन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये त्याच्या गळ्यात हार डोक्यावर फेटा व हातात विठूरायाची एक सुंदर मूर्ती देखील दिसत आहे. त्यामुळे नक्की या लूकमागे दडलंय तरी काय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. परंतू पोस्टच्या कॅप्शनमध्ये हा घडलेला संपूर्ण प्रकार लिहून चाहत्यांसोबत त्याचा अनुभव शेअर केला.
हा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करताना प्रसादने लिहिले की, “आज अचानक पॅकअप नंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप व्हॅनिटी वॅनमध्ये आला आणि म्हणाला, ‘दादा, माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत. त्यांना ५ मिनिटं देशील का?’ मी म्हटलं बोलाव. त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे २/३ मित्र अशी काही मंडळी आली. काही कळायच्या आत एकाने मला फेटा बांधला. दुसऱ्याने गळ्यात हार घातला आणि तिसऱ्याने म्हणजे नवनाथने ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली. आणि सगळे जाऊ लागले. मी म्हणालो ‘एवढ्याचसाठी आला होतात?’ त्यावर ते म्हणाले ‘हो दादा, वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी. बस.’ आणि सगळे क्षणार्धात मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले.”
तसेच पुढे प्रसादने लिहिले की, “मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक ‘अवघड वाट’ आहे. पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे. अशा वेळी कुठं चुकलो तर? म्हणून मला ‘संगत’ द्यायला आला असावा की काय तो? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्तीकडे पाहिलं आणि त्या क्षणी ‘धर्मवीर’ मधील आमच्या संगीताताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले. ‘संगतीनं ओलांडला अवघड घाट, चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट, तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट, सुख दुःख एका मेका वाटलं, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल!!!”
यावरून प्रसादच्या चाहत्यांचे त्याच्यावर किती प्रेम आहे, हे समजून येते. प्रसाद ओक सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित असलेला चित्रपट ‘महापरिनिर्वाण’ याचे चित्रीकरण करत आहे. तर दुसरीकडे त्याचा ‘वडापाव’ आणि ‘जिलबी’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.