भारतीय मनोरंजनसृष्टीतील गानसम्राज्ञी म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या गायिका म्हणजे शास्त्रीय गायक पं. दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या ‘लता मंगेशकर’.
संपूर्ण जग त्यांना प्रेमाने ‘लता दीदी’ म्हणून आजही हाक मारतात. आज त्यांचा जन्मदिवस, २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता दीदींचा जन्म झाला होता. बालपणापासूनच त्यांच्यावर संगीताचे उत्तम संस्कार झाले. त्यांच्या गाण्याचे आणि त्यांच्या मधुर आवाजाचे वेड लागले नाही, असा एकही प्रेक्षक नाही. इतक्या वर्षानंतरही त्यांनी गायलेली गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
त्यांचा आवाज ऐकून आजही कणखर व धिप्पाड माणसाच्या डोळ्यात पाणी येते, लढणाऱ्याला युद्धासाठी भरारी येते, तर त्यांच्या आवाजातून व्यक्त होणाऱ्या भावनांतून पुनः पुन्हा प्रेमात पडावे वाटते. लता दीदींचा आवाज म्हणजे थेट काळजाला भिडणारा आणि भेदणारा. अशा या लता दिदींनी जवळपास ३६ भाषांमध्ये पाच हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यासाठी त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी देखील गौरविले आहे.
साधी, सरळ राहणी आणि जीवनसरणी यामुळे लता दीदींचा वेगळेपणा सहजपणे त्यांच्या चाहत्यांसमोर येत असे. लता दीदी यांची आठवण काढली की, लगेच सफेद रंगाच्या साडीतील लता दीदींचा निरागस चेहरा नजरेसमोर येतो. अनेकदा त्या सिल्कच्या साडीतही दिसल्या, परंतू त्यांनी कायम सफेद रंगाचीच साडी नेसली, बदल झाला तो फक्त सफेद रंगाच्या साडीच्या बॉर्डरमध्ये. यामागचे कारण विचारले असता लता दीदी उत्तरल्या होत्या की, “लहानपणापासूनच मी पांढऱ्या रंगाच्या प्रेमात आहे. लहानपणी परकर पोलकंही मी पांढऱ्या रंगाचंच घालत असे. साडी नेसायला सुरुवात केल्यानंतर मी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची साडी नेसत असे. पण दोन्ही रंगापैकी कोणत्या रंगाची साडी नेसायची हे मला कळत नव्हतं. त्यामुळे मी फक्त पांढऱ्या रंगाची साडी नेसण्याचा निर्णय घेतला.”
तसेच लता दीदींना सोन्याच्या दागिण्यांहून हिऱ्याच्या दागिन्यांची भारी आवड. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पहिल्या कमाईतून आईसाठी सोन्याचे दागिने तर स्वतःसाठी हिऱ्याची अंगठी घेतली होती, जी शेवटपर्यंत त्यांच्या जवळ होती.
तसेच त्यांनी आजीवन लग्न का केले नाही? असा प्रश्न त्यांना अनेकदा विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी त्यांचं प्रेम व्यक्त केले होते. हृदयनाथ मंगेशकर यांचे मित्र म्हणजे डुंगरपूर राजघराण्यातील महाराज राज सिंह यांच्यावर त्यांचे प्रेम होते. महाराजांचेही लता दिदींवर प्रेम होते. महाराजांचे लग्न कोणत्याही सामान्य मुलीशी न करण्याचा हट्ट त्यांच्या कुटुंबियांचा होता. तर घरच्या जबाबदारीमुळेही लता दिदींनी लग्नाचा निर्णय बदलला.
संपूर्ण जगाला वेड लावणाऱ्या या गानकोकिळेची प्राणज्योत ६ फेब्रुवारी रोजी मालवली. परंतू त्यांची गाणी काल, आज आणि उद्या कायम आपल्या काळजात राहतील.