अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) हिने अभिनय क्षेत्रात तिची वेगळी छाप उमटवली आहे. तिने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केले. अभिज्ञाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. मराठीसोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील तिने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिज्ञा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिज्ञाने ७ जानेवारी २०२१ रोजी मेहुल पै याच्यासोबत लग्नगाठ बांधली.
सगळं काही सुरळीत असताना अचानक अभिज्ञाच्या पतीला कॅन्सरचं निदान झालं आणि इथून त्यांचा नवा लढा सुरू झाला. आपल्या पतीला कॅन्सर आहे, हे अभिज्ञाला तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी समजलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिज्ञाने यावर भाष्य केलं. तेव्हा लग्नाचा पहिला वाढदिवस कसा साजरा केला? असं अभिज्ञाला विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, “दुर्दैवाने लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला आम्हाला मेहुलच्या ‘कॅन्सर’विषयी समजलं. तरीही मी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. आपण यंदा काहीतरी वेगळं करायचं जे यापूर्वी कधीही केलेलं नाही असा मी विचार केला होता. कारण, तो लग्नाचा पहिला वाढदिवस आमच्या दोघांच्या कायम लक्षात राहिला पाहिजे अशी माझी इच्छा होती.”
यावर मेहुल म्हणाला की, “मी जितका प्रॅक्टिकल आहे तितकी ती नाहीये. त्यामुळेच अॅनिव्हर्सरीच्या दिवशी जेव्हा कँसरचं कळलं तेव्हा खरं सांगायचं तर मी जेव्हा रिपोर्ट घेतले. हातात जेव्हा आले तेव्हाच मला कळलं की काहीतरी गडबड आहे यात. मी डॉक्टरांना फोन केला. ते मला म्हणाले की आपण दोन दिवसांनी बोलू. तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी गडबड आहे. पण अॅनिव्हर्सरीचा दुसरा दिवस होता. मी हिला काही बोललो नाही. घरी आलो. मी ते रिपोर्ट जरा लपवून ठेवले. हिला कळायला नको म्हणून. हिला काय झालं माहीत नाही. हिने ते रात्री शोधून काढले. ते चेक केले. गूगल केलं आणि ही रात्री रडायला लागली. मला उठवलं की हे काय आहे, मला सांगितलं का नाही वगैरे.”
तसेच पुढे मेहुल म्हणाला, “मी झोपलो होतो. मी म्हणालो आता जे आहे ते आहे. आता काही करू शकत नाही. पण जेव्हा त्यावरचे उपाय सुरु झाले तेव्हा तिच्यात कुठून ताकद आली माहित नाही, पण तेव्हा तिला कळलं होतं की आता सगळं आपल्यालाच करायचं आहे.” पुढे अभिज्ञा म्हणाली, “याच्या घरी चर्चा हा प्रकारचं नाहीये. त्यामुळे मला ते एवढं सफोकेट झालं होतं, मला कुठे रडता येत नव्हतं. पण नंतर मला कळल की ते सगळे घरातलं वातावरण नीट ठेवण्याचा प्रयत्न करतायत. मग मी स्वतः ला सावरलं कारण तिथे जर मी रडले असते तर सगळचं अवघड झालं असतं. तेसुद्धा ढासळले असते. पण ते १० दिवस खूप भयानक होते.”
अभिज्ञाचा हा कटू अनुभव तिने चाहत्यांसोबत शेअर केला, तेव्हा सारेच तिच्या धाडसाचे कौतुक करीत होते.