मागील काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत एकामागोमग एक दमदार मराठी सिनेमांची सरबत्ती सुरुच आहे. तर सर्वाधिक लोकप्रिय झालेल्या आजवरच्या मराठी सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva). प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रचंड गाजला.
नवा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या केदार शिंदे यांच्या या सिनेमात सहा बहिणींची आगळीवेगळी गोष्ट या सिनेमातून सांगितली आहे. या सिनेमाने फक्त प्रेक्षकांच्या मनावरच नाही तर बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या सिनेमामुळे मराठी सिनेसृष्टी पुन्हा एकदा नव्या उंचीवर जाऊन पोहोचली. त्यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांसहित इतरांनी देखील हा सिनेमा आवर्जून पहिला. सिनेमा पाहिल्यावर केवळ मराठी कलाकारच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील या सिनेमाचे भरभरून कौतुक केले.
View this post on Instagram
या सर्वांपाठोपाठ आता बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी देखील बाईपण भारी देवा या सिनेमाबद्दल एक खास स्टोरी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी बाईपण भारी देवा हा मराठी सिनेमा पाहून त्यांचे मत व्यक्त केले. खरं तर त्यांचे मत व्यक्त करताना त्यांनी या सिनेमाचे आणि त्यातील कलाकारांचे कौतुक केले. इंस्टाग्रामवर स्टोरीमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, “काल मी ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट पाहिला. गेल्या काही दिवसांत एवढा सुंदर चित्रपट मी खरंच पाहिला नव्हता. हा चित्रपट ऑस्करसाठी पात्र तर आहेच पण, बाईपण भारी देवाला राष्ट्रीय पुरस्कार तरी मिळालाच पाहिजे.”
तर सिनेमाच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचे कौतुक करताना त्यांनी लिहिले की, “सगळ्यांनी अतिशय दमदार काम केलेलं आहे. यात सगळ्यात मोठं श्रेय केदार शिंदे यांचं आहे. अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हा चित्रपट बनवला. टायमिंग, छोट्या छोट्या गोष्टींवर बारकाईने काम केलंय. माझ्याकडे खरंच शब्द नाहीत. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा चौधरी तुम्ही कमाल आहात! तुमच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आणि भविष्यात तुम्हाला आणखी यश मिळो एवढीच प्रार्थना! प्रेक्षकांना एकच सांगेन… हातातली सगळी कामं बाजूला ठेऊन एकदा तरी हा चित्रपट पाहा आणि मला नंतर धन्यवाद म्हणा!”
विवेक अग्निहोत्री यांनी सिनेमावर आणि कलाकारांवर केलेल्या या कौतुकाच्या वर्षावाची ही स्टोरी रिशेअर करत केदार शिंदे यांनी लिहिले की, “खूप खूप धन्यवाद सर”.
त्यामुळे २०२३ साली प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा या सिनेमाची सध्या पुन्हा एकदा सर्वत्रच चर्चा सुरु झाली आहे.
Read More : आयुष्याचा जोडीदार कसा हवा? यावर ‘सायली संजीव’ ने मांडले दिलखुलास मत