प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अशी गोष्ट घडते जी कायम आपल्या लक्षात राहण्यासारखी असते. प्रत्येकजण काहीना काही मिळवण्यासाठी अपार कष्ट करत असतो. मग ती गोष्ट छोटी असुदे किंवा मोठी. असचं काहीसं आपल्या मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घडलं आहे. तो अभिनेता म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू म्हणजेच सिध्दार्थ जाधव (Siddharth Jadhav).
सिध्दार्थ हा नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या सिध्दार्थची सगळीकडे चर्चा होत आहे. त्याचे कारणही तितकेच खास आहे, नुकताच सिद्धार्थचा ‘लग्न कल्लोळ’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात सिध्दार्थसोबत अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री मयुरी देशमुख हे मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. दोन नवरे आणि एक नवरी तसेच लग्न संस्थेमध्ये चालणारा सगळा कल्लोळ या सिनेमात दाखवला गेला आहे.
सध्या सिध्दार्थ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या निमित्ताने सिध्दार्थ अनेक ठिकाणी भेट देत आहे. दरम्यान सिध्दार्थने कोपरगाव इथे प्रमोशननिमित्त हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या सोबत असं काही घडलं की त्याला स्वतःला देखील त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. सिनेमाच्या प्रमोशननिमित्त सिध्दार्थच्या चाहत्यांनी कोपरगाव येथे त्याचे तब्बल २५ फुटांचे कटआउट लावले होते. यावेळी चाहत्यांनी त्याच्या कटआउटला दुधाचा अभिषेक घातला. पण बाकीचे दुध वाया जाऊ न देता, ५०० विद्यार्थ्यांना ते वाटण्यात आले. याचे व्हिडीओ आणि फोटो शेअर करत सिध्दार्थने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत सिद्धार्थ म्हणाला की, “जाम भारी फिलिंग!!! लग्न कल्लोळच्या निमित्ताने जे प्रेम मिळतंय त्यावर खरच विश्वास बसत नाहीये.. आज कोपरगावमध्ये लग्न कल्लोळचा premier होता. आणि थिएटरच्या बाहेर माझा २५ फुटाचा भला मोठा cutout उभारला गेला.. त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात आला.. (ते दूध प्रतिकात्मक होतं.. दूध वाया जाऊ नये म्हणून ते दूध ५०० विद्यार्थ्यांना वाटण्यात आलं…) माझ्या २४ वर्षाच्या या छोट्याश्या कारकीर्दीत हे पहिल्यांदाच घडतंय… बापरे काय कमाल वाटत होतं.. खरंच मयूर सर आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार.. मराठी कलाकार म्हणून मायबाप रसिकांचा जो आशीर्वाद मिळतोय तो खरच स्वप्नवत आहे.. आणि लग्न कल्लोळला मिळणारा प्रतिसाद खूप भारी आहे… हा अभिषेक म्हणजे तुमच्यातल्याच एका सर्वसामान्यावर तुम्हीच तुमच्या प्रेमाचा केलेला वर्षाव आहे. लव्ह यू आॅल असाच प्रेम असुदे!!!”.
दरम्यान सिध्दार्थच्या या सिनेमाचं आणि त्याच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक होताना दिसून येत आहे.