गेल्या अनेक वर्षांपासून मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya).
मागील काही वर्ष या शोने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या शोमधील कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, भाऊ कदम, श्रेया बुगडे आणि या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा हाती घेतलेला निलेश साबळे आणि असंख्य कलाकारांनी मिळून हा शो आणि एकूणच मराठी शो एका नव्या उंचीवर नेऊन ठेवला. या शोमधून अनेक कॉमेडी कलाकारांनी आपल्या अभिनयाने, कौशल्याने आणि चतुरस्त्र विनोद बुद्धीने गेल्या १० वर्षांपासून देशभरातीलच नाही तर अगदी सातासमुद्रापार असलेल्या मराठी आणि अमराठी प्रेक्षकांना देखील खळखळून हसवले.
नुकतेच चला हवा येऊ द्या या शोला १० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने या शोचे काही विशेष भाग प्रदर्शित होत आहेत. पण हे भाग संपल्यावर हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा शो ऑफ एअर जाण्याची चर्चा ही आत्ताच नाही तर मागील काही महिन्यांपासून सुरूच होती. याचे कारण देखील अगदी तसेच आहे. तब्बल १० वर्षे चला हवा येऊ द्या या शोच्या सूत्रसंचालनाची धुरा लीलया पार पाडणारा डॉ. निलेश साबळे याने देखील काही दिवसांपूर्वीच हा शो सोडला. त्यांनतर शोमधील सूत्रसंचालनाची जबाबदारी श्रेया बुगडे आणि कुशल बद्रिके यांनी पार पाडली. पण आता झी मराठी वाहिनेचे आभार मानत कुशलने एक पत्र लिहिले. त्यामुळे कुशलने देखील हा शो सोडल्याची चर्चा रंगली आहे. शिवाय कुशल लवकरच हिंदीतील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे त्याने स्वतः व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना सांगितले.
शोमधील अनेक कलाकारांच्या एक्झिटनंतर आता हा शो लवकरच निरोप घेण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवाय झी मराठी वाहिनीवर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘नवरी मिले हिटलरला’ या दोन मालिकांचा प्रोमो सध्या दाखवण्यात येत आहेत. या मालिका येत्या १८ मार्चपासून अनुक्रमे ९.३० आणि १०.०० वाजता प्रदर्शित होणार आहेत. सध्या वाहिनीकडून किंवा कलाकारांकडून चला हवा येऊ द्या या शोच्या ब्रेकची किंवा ऑफ एअरची कोणतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत या शो संबंधित नवे आणि मोठे अपडेट समोर येण्याची दाट शक्यता आहे.