मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) हिची कालपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. पूनमच्या सोशल मीडियावर एक पोस्ट होताच क्षणी तिचं निधन झाल्याची बातमी अगदी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली.
शुक्रवारी म्हणजे २ फेब्रुवरी रोजी पूनम हिचं सरव्हायकल कॅन्सरमुळे (गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) मृत्यू झाला अशी पोस्ट तिच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवरून शेअर करण्यात आली. ही बातमी खोटी आहे अस खूप लोक म्हणत होते. मात्र अनेक सेलिब्रिटी, मीडिया पोर्टल्स तसेच पूनमच्या फॅन्सला ही बातमी खरी वाटली होती. अचानक अशी बातमी समोर आल्यामुळे अनेकांना याचा धक्का देखील बसला.
तर आता स्वतः पूनम हिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत ती जिवंत असल्याची बातमी दिली आहे. पूनम म्हणते की, “मी जिवंत आहे, कर्करोगामुळे माझा मृत्यू झालेला नाही. सुदैवाने सरव्हायकल कॅन्सरमुळे माझं निधन झालेलं नाही. पण, आज देशातील हजारो महिलांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. कित्येक महिलांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या गंभीर आजाराचा सामना कसा करायचा याबद्दल पुरेशी जनजागृती महिलावर्गात झालेली नाही. पण, तुम्हाला माहितीये का? सरव्हायकल कॅन्सर हा पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी आरोग्य तपासणी व HPV लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. आपण एकत्र मिळून या आजाराबाबत जनजागृती करुया. तुम्ही माझ्या वेबसाइटला जरुर भेट द्या. ही बातमी पैशांसाठी नव्हे तर जनजागृतीसाठी पसरवली.”
पण या कृत्यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर चांगलाच संताप व्यक्त होत आहे. राखी सावंत, अली गोणी, शार्दुल पंडित ते अगदी एकता कपूरने देखील तिच्या या कृत्यावर संताप व्यक्त केला. शार्दुल पंडित एक व्हिडीओ शेअर करत म्हणाला की, “ पूनम जिवंत आहे, यासाठी मी देवाचे आभार मानतो. मी हा व्हिडीओ का बनवतोय? मी तिला कॉल का केला नाही? तर मी तिला कॉल केला होता. पण, तिचा फोन व्यस्त येत आहे. मी तिला अनेकदा फोन केले. मला त्या सगळ्यांची माफी मागायची आहे, ज्यांनी काल माझी काळजी घेतली. त्या लोकांची मी माफी मागतो ज्यांच्याशी मी ऑनलाईन भांडलो की तुम्ही असा विचार का करत आहात. मी सगळ्या मीडिया पत्रकारांचीही माफी मागतो. कोणाच्याही मृत्यूवर मला प्रसिद्धी मिळवायची नाही, असं मी त्यांना म्हणालो होतो. माझ्या मित्रांचीही मी माफी मागतो.”
तसेच तो पुढे नाराजी व्यक्त करत म्हणाला की, “माझी आई कॅन्सरमुळे गेली. ज्या कोणाची ही कल्पना होती. जनजागृती करण्याचा तुमचा हेतू कितीही चांगला असला तरीही हे योग्य नाही. मला पूनमची काळजी आहे. कालच्या गोष्टीचा माझ्यावर परिणाम झाला. तुम्ही तिला ओळखत नाही, असं मी सगळ्यांना म्हणत होतो. पण, काही गोष्टींची मर्यादा असते. जनजागृती करायला हवी पण तुम्हाला काय झालंय? मृत्यू हा जोक नव्हे. कॅन्सरमुळे मी माझ्या आईला गमावलं. ही कल्पना अजिबात चांगली नव्हती.”
तसेच प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हा प्रयत्न केला, असे अनेकांनी उघडपणे मांडले. पूनमचं ध्येय कितीही चांगलं असलं तरी तिचा मार्ग हा प्रचंड चुकीचा होता असं प्रत्येकाचंच म्हणणं आहे. त्यामुळे भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आणि तिच्या अनेक चाहत्यांनी देखील तिच्यावर नाराजी व्यक्त केली.
Also Watch: Poonam Pandey’s Death: Celebrities React