विठ्ठल उमप फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘मृदगंध पुरस्काराची’ नुकतीच घोषणा झाली. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश विठ्ठल उमप यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच ही घोषणा केली आहे. यंदाचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ हा मराठी सिनेसृष्टीतील जेष्ठ अभिनेते ‘दिलीप प्रभावळकर’ यांना देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांनी हिंदी आणि मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपटांमध्ये चार दशकांहून अधिक काळ त्यांची कारकीर्द आहे. चेहऱ्यावरच्या हावभावांवर व प्रभावी संवादफेकीवर समोरच्याला खिळवत ठेवणे ही एक कला दिलीप प्रभावळकरांना चांगलीच अवगत आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक विनोदी, गंभीर, आक्रमक भूमिका अतिशय सफाईने वठविल्या आहेत.
यंदाचा १३ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारोह व विठ्ठल उमप फाऊंडेशनचा मृदगंध पुरस्कार वितरणाचा सोहळा २६ नोव्हेंबरला ठाणे येथील काशीनाथ घाणेकर सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा समीरा गुजर जोशी सांभाळणार आहेत. या सोहळ्यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. त्यामुळे ठाणेकर या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी करणार हे नक्की.
मृदगंध पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना देण्यात येतो. यावर्षी या पुरस्कारासाठी अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची निवड झाली. तसेच त्यांच्या सोबतच केतकी माटेगावकर, चिन्मयी सुमित व सुमित राघवन यांना देखील या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे.
मृदगंध पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, श्रीमती निलम गोरे, उदय सामंत, श्री. अशोक शिनगारे, श्री. संदीप माळवी, उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात डॉ. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा ‘आयुष्यावर बोलू काही’ हा कवितांचा विशेष कार्यक्रम संपन्न होणार असून शाहीर बापू जाधव यांच्या लोककला शाहिरीचा तसेच खुशाबा यांच्या आदिवासी नृत्याचा आस्वादही रसिकांना या सोहळ्यादरम्यान घेता येईल.
गायक नंदेश उमप यावेळी बोलताना म्हणाले, ‘बाबांनी लोककलेसाठी आपलं आयुष्य वेचलं. जेव्हा ते रंगमंचावर उभे राहायचे तेव्हा एक ‘चैतन्य’ संचारायचं. याच ‘चैतन्या’चा शोध घेत विविध क्षेत्रात आपलं बहुमूल्य योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करणे ही अभिमानाची गोष्ट आहे.’
यापूर्वी त्यांना नाट्यक्षेत्रातील योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी पुरस्कारही देण्यात आला होता.