बॉलिवूड मध्ये नेपोटीझम, एखाद्याला वेगळ पाडणे या सगळ्या गोष्टी नेहमीच सुरु असतात. पण यावर उघड उघड भाष्य करणारे कलाकार फारच कमी आहेत. त्यात बाहेरून आलेल्या एखाद्या कलाकाराला अतिशय वाईट वागणूक दिली जाते, त्या कलाकाराला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान पक्क करण्यासाठी अपार कष्ट घ्यावे लागतात. असे खूप कमी कलाकार बॉलिवूडमध्ये आहेत जे या सगळ्याबद्दल उघडपणे बोलतात. यामध्ये कंगना राणावत ही नेहमीच या सगळ्याबद्दल बोलताना दिसून येते. आता आणखी एका कलाकाराने या सगळ्याबद्दल भाष्य केले आहे.
मागील काही दिवसांपासून अभिनेता ‘शाहीद कपूर’ (Shahid Kapoor) हा त्याच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’या सिनेमामुळे चर्चेत आहे. शाहीद नेहमीच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो, तसेच तो नेहमीच सोशल मिडीयावर अॅक्टिव्ह असतो. शाहिदने २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तब्बल १०० अॉडिशन्स नंतर त्याला हा सिनेमा मिळाला होता. शाहीद हा सध्या बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता आहे. शाहीदच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमातील त्याच्या अभिनयाला, डान्सला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल आहे. या सिनेमानिमित्त शाहीद अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतच एका मुलाखती दरम्यान त्याने बॉलिवूडमध्ये बाहेरून आलेल्या लोकांना कशी वागणूक मिळते याबद्दल भाष्य केले.
नेहा धुपिया हिच्या ‘नो फिल्टर नेहा’या शोमध्ये तो या सगळ्याबद्दल बोलताना दिसला. यावेळी त्याने अनेक खुलासे केले, शाहीद म्हणाला, “मी जेव्हा दिल्लीवरून मुंबईत आलो तेव्हा शाळेत मला वर्गातील मित्रांनी कधीच स्वीकारलं नाही. मी बाहेरचा मुलगा म्हणूनच राहिलो, कारण माझं वागणं हे दिल्लीतील लोकांसारख होतं. अनेक दिवस मला वाईट वागणूक देण्यात आली.
पुढे नेहाने त्याला विचारले की, तू बॉलिवूडमध्ये आल्यानंतर कोणत्याही कॅम्पचा भाग होतास का? त्यावर शाहीद म्हणाला, “माझ्यात कॅम्पी व्यक्ती असण्याचा कोणताही गुण नाही. मला ही कॅम्पी संस्कृती आवडत नाही.
पुढे तो म्हणाला, “जेव्हा मी इंडस्ट्रीत आलो तेव्हा मला जाणवले की, बॉलिवूड इंडस्ट्रीसुद्धा शाळेप्रमाणेच आहे. इथे बाहेरच्या लोकांना सहज स्वीकारले जात नाही. बाहेरून एखादी व्यक्ती जेव्हा इंडस्ट्रीत येते, तेव्हा इथल्या लोकांना तो एक समस्येसारखा वाटू लागतो. मला गटबाजी बिलकुल आवडत नाही. या इंडस्ट्रीत गटबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. तुम्ही जर एखाद्याला पसंत करत नसाल तर त्याला कमीत कमी खाली पाडण्याचा किंवा त्याला संधी मिळू नये यासाठी प्रयत्न करते, असे प्रकार तरी करू नका.”