मराठी मालिकाविश्वात अनेक नव्या मालिका (Serial) सध्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत अव्वल राहण्यासाठी छोट्या पडद्यावरील अनेक वाहिन्या मालिकांवर वेगवेगळे प्रयोग करत आहेत.
छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह, कलर्स मराठी, झी मराठी या वाहिन्यांवर काही जुन्या मालिका ऑफ एअर होऊन नुकत्याच काही नव्या मालिका सुरु झाल्या आहेत. त्यापैकी कलर्स मराठीवर एकामागोमाग एक नव्या मालिकांची सरबत्तीच सुरु आहे. पण नवी मालिका येणार म्हणजे जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणारच. काही दिवसांपूर्वीच ‘इंद्रायणी’ ही मालिका प्रदर्शित झाली आहे. तर आता त्या पाठोपाठ ‘सुख कळले’ ही मालिका आणि ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या कॉमेडी शोची घोषणा झाली आहे.
सुख कळले आणि हसताय ना हसायलाच पाहिजे हे दोन नवे कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार म्हणजे सध्या सुरु असणाऱ्या कोणत्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याचीच चिंता मालिकांचे चाहते करत आहेत. सध्या रात्री ९.०० वाजता सुरु असणारी मालिका म्हणजेच ‘रमा-राघव.’ रमा-राघव या मालिकेत नुकताच गोळीबारचा सीन पार पडला, या झटापटीत राघवला गोळी लागली असेल अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे जर राघवची भूमिका संपली तर ही मालिका देखील संपण्याची शक्यता आहे. तसेच यानंतर ९.३० वाजता सुरु असलेली ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत रत्नमाला मोहिते हिने सानियावर गोळी झाडल्यामुळे तिला जेल झाली आहे. आणि लगेचच आता तीन महिन्यांचा पुढचा काळ देखील दाखवण्यात आला. त्यामुळे ही मालिकासुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची तितकीच शक्यता आहे.
तर नुकतीच घोषित झालेली अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता सागर देशमुख या दोघांची मुख्य भूमिका असलेली सुख कळले ही मालिका येत्या २२ एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या मालिकेच्या प्रसारणाची वेळ देखील घोषित झाली आहे. ही मालिका रात्री ९.०० वाजता प्रसारित होणार आहे. तर ९.०० वाजता सध्या सुरु असलेली रमा-राघव ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत नसून २२ एप्रिल पासून रात्री ९.३० वाजता ही मालिका आपल्याला पाहता येणार आहे. आणि सध्या ९.३० वाजता प्रक्षेपित होत असलेली भाग्य दिले तू मला ही मालिका ऑफ एअर जाणार आहे.
नुकतीच भाग्य दिले तू मला या मालिकेची व्रॅपअप पार्टी झाली. यावेळी मालिकेतील अनेक कलाकार भावूक झाले होते. तर मागील दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात बसलेली ही मालिका आता निरोप घेणार म्हणून मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे.