मागील काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत निरनिराळ्या विषयांना घेऊन सिनेमे बनवले जात आहेत. हे सिनेमांचे प्रयोग आपल्या लाडक्या कलाकारांच्या कौशल्याने रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहेत. सध्या असाच नवा प्रयोग करणारी मराठी मालिकाविश्वातील सर्वाधिक गाजलेली अभिनेत्री म्हणजे ‘अक्षया देवधर.’
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे ‘अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी म्हणजेच पाठकबाई आणि राणा दा.’ या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावरच घेतले होते. त्यानंतर त्यांची ही जोडी सत्यात उतरली म्हणजे, जेव्हा अक्षया आणि हार्दिकने लग्नगाठ बांधली तेव्हा मात्र त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला सीमा नव्हती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर अक्षया आणि हार्दिक यांचीच चर्चा सुरु आहे. तसेच सध्या ते लग्नानंतरचा प्रत्येक पहिला सण जोरदार साजरा करत सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांना देखील याचे साक्षीदार करत आहेत.
खासगी आयुष्याबद्दल अनेकदा चर्चेत असलेली अक्षया आता तिच्या करिअरमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर अक्षया ना कोणत्या मालिकेत, ना कोणत्या सिनेमात दिसली. अक्षयाच्या कामातील ब्रेकबद्दल बोलताना हार्दिक म्हणाला होता की, “लग्नानंतर वर्षभर मी घरात नाहीये. लग्न करून पुण्यात गेल्यानंतर देवीच्या कृपेनं, प्रेक्षकांच्या कृपेनं, परमेश्वराच्या कृपेनं मी सतत काम करतोय. ती एक स्त्री पाठिशी उभी आहे, ती समजून घेतेय आणि तिनं स्वतःची कामं थांबवली आहेत. तू पहिला सेट हो, तू ये, मग मी काम करते, असं अक्षयाचं म्हणणं आहे. त्यामुळं ती मालिका किंवा चित्रपटांत दिसत नाहीये.”
त्यामुळे अक्षयाला अभिनय करताना पुन्हा कधी पाहायला मिळणार याकडेच चाहत्यांचे लक्ष वेधले होते. परंतू आता अक्षयाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता लवकरच अक्षया सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ‘पिल्लू बॅचलर’ हा अक्षयाचा पहिला-वहिला नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंस्टाग्रामवरून स्टोरी शेअर करत अक्षयाने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमाच्या नावावारून या सिनेमात प्रेमकहाणी आहे की आणखी काही? हा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
View this post on Instagram
या सिनेमात अक्षयासोबत लोकप्रिय अभिनेत्री ‘सायली संजीव’ सुद्धा अभिनय करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सिनेमाबद्दल चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. तर यांच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, शशांक शेंडे तसेच अभिनेत्री शिवाली परब आणि सविता मालपेकर ही कलाकार मंडळी या सिनेमात झळकणार आहेत. तसेच अभिनेता पार्थ भालेराव मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे.
पिल्लू बॅचलर या सिनेमाचे दिग्दर्शन तानाजी घाडगे यांनी केले असून वर्षा पाटील, सुनिल फडतरे, अभिजित देशपांडे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. अक्षयाचा हा सिनेमा येत्या ८ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक उत्सुक आहेत.