अभिनेत्री आणि दिग्दर्शिका ‘मृणाल कुलकर्णी‘ यांच्या आजवरच्या कामाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. फत्तेशिखस्त, पावनखिंड, सोन परी, जरा हटके, वेलकम होम, द काश्मीर फाईल्स यांसारख्या अनेक मराठी व हिंदी मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्या घराघरात पोहोचल्या आहेत.
मृणाल यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकण्याआधी त्या प्राध्यापिका होत्या. स्वामी या मालिकेतून त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या अभिनयामुळे त्या एक हरहुन्नरी आणि प्रतिभावंत अभिनेत्री ठरल्या आहेत. त्यानंतर त्यांचा लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून प्रवास सुरू झाला. मृणाल यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकण्यामागे त्यांचा मुलगा म्हणजे ‘विराजस कुलकर्णी‘ निमित्त ठरला.
अभिनेता विराजस हा फक्त उत्कृष्ट कलाकारच नाही तर उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शकही आहे. अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात करण्याआधीच त्याने लेखक आणि दिग्दर्शक म्हणून करियरची सुरुवात केली होती. आणि आज त्याच्यामुळेच मृणाल कुलकर्णी देखील दिग्दर्शन क्षेत्रात उतरल्या आहेत. पण तेव्हा नक्की काय झाले ते विराजसने ‘मदर्स डे’निमित्त सांगितले आहे.
View this post on Instagram
विराजसने मुलाखतीमध्ये सांगितले की, “मी माझ्या मित्रांबरोबर प्रायोगिक नाटकांमध्ये काम करत होतो. आपल्या मनासारखं नाटक करता यावं यासाठी आम्ही मित्रमंडळींनी मिळून एक नाट्य संस्था सुरू केली. या नाट्य संस्थेच्या अंतर्गत मी ‘ॲनाथमा’ हे पहिलं इंग्रजी नाटक लिहिलं. पुण्यातून या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या नाटकाचे सर्व शो हाऊसफुल होत होते. हे पाहून माझ्या आईला खूप अभिमान वाटला आणि ती मला म्हणाली की, आता मीही दिग्दर्शनात पाऊल टाकते. आणि तिने तिचा ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला.”
आज मृणाल कुलकर्णी उत्तम दिग्दर्शिका म्हणूनही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’, ‘रमा माधव’ या सिनेमांचे दिग्दर्शन केले. तसेच त्यांचा ‘फक्त महिलांसाठी’ हा आगामी सिनेमा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.