तुम्हाला माहिती आहे का, या वर्षी 9 नोव्हेंबरला शाहरुख आणि दीपिकाचा ओम शांती ओम सिनेमा प्रदर्शित होऊन 15 वर्षे पूर्ण झाली.
त्या सिनेमाची प्रत्येक गोष्ट आजही चाहत्यांचा आवडता विषय आहे. खासकरून आठवणीत राहतं ते म्हणजे दीपिकाचा पहिला सिनेमा, शाहरुखचा डबल रोल, अप्रतिम सेट्स, लोकेशन्स, हँडसम हंक अर्जुन रामपालची निगेटिव्ह भूमिका, श्रेयस तळपदेसारखा मित्र आणि खासकरून त्यातली गाणी.
दिग्दर्शक फराह खानच्या आग्रहाखातर स्क्रीनवर एकत्र आलेले धर्मेंद्र, संजय दत्त, सलमान खान, शाहरुख, सैफ यांचा गेस्ट एपियरन्स होता, आमिरने यासाठी नकार दिला होता. शाहरुखने दर्दे-डिस्कोच्या गाण्यासाठी ३ महिन्यांची मेहनत घेतली होती, या सर्वांच्या जोरावर सिनेमाने तब्बल १५० कोटींचा गल्ला केला होता.
ओम शांती ओम मधल्या गाण्यांचा विषय चाहत्यांचा अगदी जवळचा आहे, विशाल-शेखर यांनी संगीतबद्ध केलेल्या, गाण्यांची लोकप्रियता आजपर्यंत जशीच्या तशी आहे आणि युट्युबवर लाखो व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत.
पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की चित्रपटाच्या संगीतासाठी विशाल-शेखर ही लोकप्रिय संगीत जोडी पहिली पसंती नव्हती.
ओम शांती ओमचे लेखक मुश्ताक शेख यांनी ‘द मेकिंग ऑफ ओम शांती ओम’ या पुस्तकात या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात ते म्हणतात की, दिग्दर्शक फराह खानने सुरुवातीला चित्रपटाचा अल्बम तयार करण्यासाठी ए आर रहमान यांच्याशी संपर्क साधला होता. दोघांनीही काही संगीत बैठका घेतल्या होत्या.
याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एक तर फरहा खानचा दिग्दर्शक म्हणून महत्वाकांक्षी सिनेमा, दुसरं कारण शाहरुख खान आणि ए आर रहमान यांनी याआधी एकूण चार वेळा एकमेकांसोबत काम केलं होतंच. त्यांचा पहिला सहयोग दिल से (1998) मध्ये होता. तो यशस्वी ठरला आणि ‘छैय्या छैय्या’ सह सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली.
त्यांचा दुसरा सिनेमा २००१ साली प्रदर्शित झालेला “वन 2 का 4 ” सिनेमा तसा बॉक्सऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही, पण गाणी फार लोकप्रिय झाली.
२००४ साली प्रदर्शित झालेला “स्वदेस” हा त्यांचा तिसरा सिनेमा पण बॉक्सऑफिसवर फार चालला नाही पण त्याचे संगीत हृदयाला स्पर्श करण्यात यशस्वी ठरले. आणि शेवटी शाहरुख खान आणि ए आर रहमान यांनी यश चोप्रा यांच्या २०१२ साली प्रदर्शित झालेल्या जब तक है जान मध्ये एकत्र काम केलं.
त्यामुळे फराह खान यांना संगीताच्या बाबतीत दर्जेदार कामाची अपेक्षा होती, पण ए आर रहमान संगीतहक्कांमध्ये शेअर्स मागण्यात फेमस आहेतच, त्यामुळे या सिनेमाच्या संगीताच्या बाबतीत निर्मात्यासोबत संगीत हक्कांमध्ये वाटा मागितल्याने गोष्टी म्हणाव्या तश्या पुढे गेल्या नाहीत.
काही दिवसांतच एआर रहमान यांच्या ऐवजी लोकप्रिय संगीतकार जोडी विशाल शेखर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली, विशाल-शेखर या दोघांनी या संधीचं अक्षरशः सोनं केलं, ओम शांती ओममध्ये काही अतिशय आनंददायी आणि भावपूर्ण गाण्यांची मांडणी केली. त्यांनी सिनेमाच्या पहिल्या भागात 70 च्या दशकाच्या संगीत स्टाईलला न्याय दिला. फराह खानने त्याच पुस्तकात म्हणते की, “त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक संगीत त्यांनी कधीच केले नव्हते”.
तर मग तुम्हाला कसा वाटला आजचा हा भाग? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडीओ आवडला असल्यास सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका.