आजकाल प्रत्येकजण कामाच्या मागे धावताना स्वतःकडे मात्र खूप सहजपणे दुर्लक्ष करतो. त्यामुळे आपल्याला आपली आणि आपल्या प्रियजनांची जास्तच काळजी वाटत असते. एवढेच नाही तर आपल्याला आपल्या लाडक्या कलाकारांची देखील बरीच चिंता सतावत असते. त्यात आणखी भर म्हणजे जर ते आजारी असतील तर अधिकच. २०२३च्या वर्षाअखेरीस आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता ‘श्रेयस तळपदे’ (Shreyas Talpade) याला अचानक आलेल्या हृदविकाराच्या झटक्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
श्रेयसच्या दोन्ही धमन्या ब्लॉक झाल्या होत्या, एक जवळपास १००% तर दुसरी ९९% ब्लॉक झाली होती. त्यामुळे श्रेयसची तत्काळ अँजियोप्लास्टी करण्यात आली. आता श्रेयस पूर्णपणे ठीक असून त्याने नुकतीच एक मुलाखत दिली. तेव्हा श्रेयस म्हणाला की, “मी शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांनी मला सांगितलं की मी त्यांच्याकडे पाहून हसलो आणि पत्नीची माफी मागितली. त्यानंतर पाच दिवस मला अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात आलं होतं. सध्या मी पुरेसा आराम करतोय. सहा आठवड्यांनंतर मी कामावर जाऊ शकतो, असं डॉक्टर म्हणाले आहेत. पण मला माझ्या कुटुंबीयांसोबत, पत्नी आणि मुलीसोबत वेळ घालवायचा आहे. काही चित्रपट बघायचे आहेत आणि पुस्तकं वाचायची आहेत. जेव्हा असं काही घडतं, तेव्हा सर्वाधिक त्रास तुमच्या कुटुंबीयांनाच होतो.”
अमिताभ बच्चन यांचे देखील त्याने उदाहरण दिले. तेव्हा तो म्हणाला की, “१९८२ मध्ये ‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर जेव्हा अमिताभ बच्चन यांचा गंभीर अपघात झाला, तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांनी काय अनुभवलं असेल, याची मी आता कल्पना करू शकतो. बिग बींनीसुद्धा नंतर त्यांच्या एका ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की, तेसुद्धा काही मिनिटांपर्यंत क्लिनिकली मृतावस्थेत होते.”
अचानक आजारी पडल्यावर श्रेयसच्या मनात आलेल्या अनेक गोष्टी त्याने सांगितल्या तेव्हा तो म्हणाला की, “मी माझ्या आयुष्यात याआधी कधीच रुग्णालयात दाखल झालो नव्हतो. कधी मला फ्रॅक्चरसुद्धा झाला होता. त्यामुळे असं काही घडेल याची मी कल्पनासुद्धा केली नव्हती. तुमच्या आरोग्याला तुम्ही गृहित धरू नका. वेळ ही खूप अनिश्चित असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जर आरोग्यच ठीक नसेल, तर बाकी कोणत्याच गोष्टींचा अर्थ नाही. जान है तो जहान है. अशा प्रकारच्या अनुभवामुळे तुमचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. मी वयाच्या १६ व्या वर्षापासून नाटकात काम करायला सुरुवात केली होती. वयाच्या विसाव्या वर्षी मी प्रोफेशनल अभिनेता बनलो. गेल्या २८ वर्षांपासून मी फक्त माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होतो. आपण आपल्या कुटुंबीयांनाही गृहित धरतो. आपल्याकडे वेळ आहे असा विचार करतो. माझ्या पालकांनाही मी त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना पाहिलंय. आपण जगण्यासाठी खूप मेहनत घेतो पण हे सर्व तितकं महत्त्वाचं आहे का? जर तुम्ही जिवंतच नसाल तर मग या सगळ्यांचा काय अर्थ आहे?”
तसेच तो म्हणाला की, “मी प्रत्येकाला हे सांगू इच्छितो की आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं. त्या सिग्नलकडे कृपया लक्ष द्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याविषयी तुमच्या डॉक्टरांना सांगा. काहीजण डॉक्टरांकडे जाणं टाळतात. ते एखादी टेस्ट करायला सांगतील, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे जात नाही. पण हे टेस्ट किती उपयोगी ठरू शकतात, हे तुम्हालाही माहीत नसतं. याबद्दल पुरावे तर नाहीत, पण मी असं अनेकदा ऐकलंय की कोविडनंतर अनेक निरोगी व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित समस्या निर्माण झाल्या. २०२० मध्ये मलाही कोविडची लागण झाली होती. मी धुम्रपान करत नाही, मद्यपान महिन्यात क्वचित कधीतरी करतो, हेल्थी डाएट फॉलो करतो, व्यायाम करतो. पण माझं शरीर मला जे सिग्नल देत होतं, त्याकडे मी दुर्लक्ष केलं.”
आता सध्या श्रेयसला पुरेपूर विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच या विश्रांतीच्या काळात तो त्याच्या कुटुंबीयांसोबत देखील वेळ घालवणार आहे.