मराठी मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री ‘सुप्रिया पाठारे’ (Supriya Pathare) यांनी अनेक मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यं गाजवलं. सुप्रिया पाठारे या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. ‘पुढचं पाऊल’, ‘जागो मोहन प्यारे’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘ठिपक्यांची रांगोळी’ यांसारख्या अनेक मालिकेतील भूमिकांमुळे त्या कायम प्रेक्षकांच्या मनात आणि आठवणीत राहतात.
सुप्रिया यांचा मुलगा मिहिर हा प्रोफेशनल शेफ आहे. परदेशात प्रसिद्ध असणारी फूड ट्रकची संकल्पना त्याने ठाण्यात सुरू केली. मिहिर पाठारे याने सुरू केलेला फूड ट्रक जोरात चालला होता. खवय्यांची याला पसंती देखील मिळत होती. त्यात यश मिळवल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्याने ठाण्यात स्वतःचं ‘महाराज’ हे नवीन हॉटेल सुरू केलं. हॉटेल सुरू केल्यानंतर दोन महिन्यांतच हे हॉटेल अनेक दिवस बंद राहिल्याने याबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या.
या हॉटेलला अनेक कलाकार मंडळींनी देखील हजेरी लावली, त्यामुळे हॉटेलला खूप चांगला प्रतिसाद मिळत होता. पण काही काळाने या हॉटेलवर अनेक संकटं आली. ‘महाराज हॉटेल’ मध्यांतरी सतत चालू, बंद होत होतं. यामागचं नेमकं काय कारण? यावर सुप्रिया पाठारे खूपच स्पष्टपणे व्यक्त झाल्या. तेव्हा त्या म्हणाल्या की, “हॉटेल बंद होण्यामागचं पहिलं कारण होतं स्टाफचं पळून गेला. मी नवीन जे हॉटेल सुरू करतात त्या लोकांना सांगेन. माझी पहिली वेळ होती, काही गोष्टी माहित नव्हत्या. एका गावातले, एका घरातले नातेवाईक असतात जे एकमेकांबरोबर काम करायला येतात, असे एकाच कुटुंबातली लोकं स्टाफमध्ये ठेवू नका. कारण जसे ते एकत्र येतात. तसेच ते एकत्र जातात. यामुळे मी शॉकमध्ये होते, हे मी शिकले आहे.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुप्रिया यांच्या आईचं निधन झाल्याने काही दिवसांसाठी त्यांचे महाराज हॉटेल बंद ठेवण्यात आले. त्यानंतर ३ नोव्हेंबरला हे हॉटेल पुन्हा खवय्यांच्या सेवेसाठी सज्ज झाले. परंतू, आता पुन्हा हे हॉटेल बंद झाल्याचं कळल्यानंतर सगळेच जण चक्रावून गेले आहेत. नक्की अडचण काय आहे हेच कोणाच्या लक्षात येईना. अखेर सुप्रिया यांनी खरी हकीकत सांगितली, तेव्हा त्या म्हणाल्या की, “मी यावेळेला सगळे दागिने विकून सगळ्या गोष्टी केल्या. कारण आलेल्या संकटांमधून बाहेर पडणं अशक्य होतं. कोणाकडून पैसे घ्यायचे, मग आपलं सगळं व्यवस्थित करायचं ते ठीक आहे. पण मला अंदाज नव्हता किती महिने असं काढावं लागणार आहे. त्यामुळे ज्याच्याकडून पैसे घेतलेत त्याला किती वेळ तंगवत ठेवायचं, हे मला पटलं नाही.”
तसेच त्या पुढे म्हणाल्या की, “मला असं वाटतं स्त्री धन म्हणतात ते त्याच्यासाठीच असतं. स्त्रीच्या अडचणीसाठी उपयोगात आणलेलं ते स्त्री धन म्हणू. त्यामुळे ते मी उपयोगात आणलं आणि मला त्याचं काही वाईट वाटतं नाही. अरे यार मला याच्यासाठी हे करावं लागलं. ठीक आहे ते माझं स्वप्न आहे, मुलाचं स्वप्न आहे. ते उभं राहण्यासाठी कराव्या लागतायत त्या गोष्टी कराव्यात. पण या सगळ्यासाठी सावध असावं लागतं.”
अभिनयासोबतच आपल्या घराची आणि मुलाची जबाबदारी देखील नेहमीच उत्तमपणे निभावताना दिसतात.