गानकोकिळा, गानसम्राज्ञी म्हणून भारतीय सिनेसृष्टीत नाव कोरलेल्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ (Lata Mangeshkar) म्हणजेच आपल्या सर्वांच्या लाडक्या लतादीदी. लतादीदींनी जरी आपला निरोप घेतला असला तरी त्यांनी गायलेली अजरामर गाणी आजही आपल्या सर्वांच्या कानात गुंजत आहेत.
आज लता दीदींचा दुसरा स्मृतिदिन. दीदींनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य गाणी गायली, ती कानावर पडताच आपसूक आपल्याला त्यांची आठवण येते. लता दीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये झाला होता. बालपणापासूनच त्यांनी संगीताचे धडे गिरवले होते, अगदी कमी वयात त्यांना संगीताचे बाळकडू पाजणारे त्यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकरच होते. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी लता दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. जन्माला आल्यानंतर लता दीदींचं नाव ‘हेमा’ असं ठेवण्यात आले होते. परंतू वडील, दीनानाथ मंगेशकर यांच्या ‘भाव बंधन’ या नाटकातील पात्रावरून प्रभावित होऊन त्यांचं हेमा हे नाव बदलून ‘लता’ हे नाव ठेवण्यात आले.
परंतू वडिलांच्या आकस्मित निधनाने घराची संपूर्ण जबाबदारी दीदींवर येऊन पडली. त्यामुळे त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षापासूनच काम करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात लता दीदींचा अभिनेत्री आणि गायिका म्हणून प्रवास सुरु झाला. १९४२ साली ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी लता दीदींनी गायलेलं “नाचू या गडे, खेळू सारी मनी हसू भारी” हे गाणं फायनल एडिटिंगवेळी कट करण्यात आले, आणि त्यांचं हे पहिलं गाणं कधीच त्यांना पाहता आले नाही. लता दीदींनी संगीत क्षेत्रामध्ये सात दशके काम केले. त्यांच्या या कारकीर्दीच्या काळात त्यांनी तब्बल ३६ भाषांमध्ये सुमारे ५० हजारांहून अधिक गाणी गायली. भारतीय सिनेसृष्टीत त्यांनी संगीत क्षेत्रात अजरामर छाप आहे. त्यामुळे आजही त्यांच्या चाहत्यावर्गाला सीमाच नाही.
View this post on Instagram
असा एकही संगीतप्रेमी नसेल ज्याने लता दीदींच एखादं गाणं ऐकायचं टाळलं असेल. ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी संपूर्ण देश आतुर असतो अशा लता दीदींनी मात्र कधीही त्यांनी गायलेलं गाणं मोठ्या पडद्यावर स्वरबद्ध झालेलं पाहिले नाही. त्याचे कारणही तितकेच खास आहे. दीदींच्या मते जर त्यांनी स्वतःच्या आवाजातील गाणं ऐकलं असतं तर त्यात त्यांनीच काही ना काही उणीवा शोधल्या असत्या. म्हणून त्यांनी स्वतः गायलेलं गाणं कधीच ऐकलं नाही.
लता दीदींच्या सिनेसृष्टीतील अलौकिक योगदानासाठी २००१ साली ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार तर ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’, ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ अशा नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. संपूर्ण भारतीयांच्या हृदयावर आपला आवाज कोरणाऱ्या या गानकोकिळेला स्मृतिदिनानिमित्त मानाचा मुजरा.