२०१६ साली आलेल्या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाने सगळ्यांनाच वेड लावले होते तो म्हणजे सैराट. सैराट या चित्रपटातून अभिनेता आकाश ठोसर आणि अभिनेत्री रिंकू राजगुरू यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. सैराट मुळे रिंकू आणि आकाश चांगलेच प्रसिद्धीझोतात आले. आजही परश्या आणि आर्ची प्रेक्षकांच्या मनात आहेत. आर्ची या भूमिकेसाठी आधी रिंकू नाही तर दुसऱ्याच अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. ती म्हणजे अभिनेत्री सायली पाटील.
लवकरच नागराज मंजुळे ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. या चित्रपटात आकाश ठोसर, सयाजी शिंदे आणि नागराज मंजुळे हे प्रमुख भूमिकेत दिसून येणार आहेत, तसेच या चित्रपटात एक नवीन चेहरा दिसून येणार आहे. तो म्हणजेच सायली पाटील हिचा. चित्रपटात आकाश ठोसर आणि सायली पाटील या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघायला मिळणार आहे.
नुकतेच एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सायली आणि आकाश उपस्थित होते. त्यावेळी त्या दोघांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा सायलीला विचारण्यात आले की “आर्चीच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली होती मात्र ती भूमिका रिंकूने केली तर तेव्हा तुझी प्रतिक्रिया काय होती?” त्यावर सायली म्हणाली, “मी खरं तर अपघाताने अभिनेत्री बनले आहे. मी तेव्हा ऑडिशनसाठीदेखील गेले नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना मला शॉर्टलिस्ट केलं होतं त्याचपद्धतीने इतर मुलींनादेखील केलं होतं.”
ती पुढे म्हणाली “माझ्या ४ ते ५ ऑडिशन झाल्यानंतर नागराज सर म्हणाले आता तुझी जवळपास निवड करण्यात आली आहे. पण मी त्यांना म्हणाले मला नाही करायचे. कारण माझ्याकडून तरी असे काही नव्हते ती भूमिका मला करायची आहे. तो विषय तिथेच थांबला त्यानंतर ‘सैराट’ आला आणि मग ४ वर्षानंतर सरांनी मला ‘झुंड’साठी विचारले.” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आहे. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हा सिनेमा येत्या ७ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.