मागील काही वर्षांपासून स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते‘ या मालिकेने असंख्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मधल्या काही काळात ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत होती.
ही मालिका आता खूपच लांबली आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांना ही मालिका आता कंटाळवाणी वाटू लागली आहे, असे अनेकांनी सोशल मीडियावर अगदी उघडपणे स्पष्ट केले आहे. या मालिकेबद्दल आता आणखी एक मोठी बाब नुकतीच समोर आली आहे. या मालिकेतील एका महत्वाच्या व्यक्तीची आता एक्झिट झाली.
या मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले रानडेने या मालिकेचा निरोप घेतला आहे. मुग्धा सुरुवातीपासून या मालिकेच्या संवाद लेखनाचे काम करत होत्या. तसेच त्या एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. त्याच वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत देखील अप्पूच्या आईची नकारात्मक भूमिका साकारत आहे. आई कुठे काय करते या मालिकेसाठी लिखाण करण्याचे काम आता त्यांनी थांबवले आहे. या मालिकेचा निरोप घेत असल्याची बातमी त्यांनी स्वतः एका पोस्टमधून दिली.
हे देखील वाचा : सिनेसृष्टीपासून दूर राहूनही करिश्मा कमावते कोट्यावधी…
मुग्धा यांनी पोस्ट करत लिहिले की, “गेली साडेतीन वर्ष ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे संवाद मी लिहित होते. आता इथून पुढे मी ते लिहिणार नाही. आई कुठे काय करते मालिकेदरम्यान प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी ऋणी आहे. नवीन काम, नवीन आव्हान आणि नव्याने पात्रांमध्ये मन गुंतवण्याची सुरुवात लवकरच होईल… कृतज्ञ”
त्यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहिले की, “तुमचे लेखन आणि संवाद आम्हाला अतिशय भावायचे… आम्हाला आनंद दिल्याबद्दल धन्यवाद.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “पुढील कामासाठी शुभेच्छा, योग्य निर्णय, मालिकेचे संवाद खूप उत्तम होते.” तर काहींनी”आता तरी बंद करा ही मालिका” अशा कमेंट्स केल्या आहेत.
मुग्धा गोडबोले रानडे यांनी या मालिकेला राम राम ठोकल्यामुळे ही मालिका लवकरच बंद होणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.