स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ सध्या नव्या प्रोमोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. ही मालिका टीआरपीच्या यादीत देखील कायम उच्चांक मिळवत असते.
मागील सव्वा तीन वर्षांपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्यं गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. गौरी, जयदीप, शालिनी, देवकी, माई, मल्हार, लक्ष्मी अशा सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करत ही पात्रं घराघरात पोहोचवली आहेत.
आपण पाहणाऱ्या प्रत्येक मालिकेत नेहमीच कोणते ना कोणते बदल होताना दिसून येतात. काही बदल हे मालिकेतील भूमिकांचा जीवनप्रवास, एखाद्या भूमिकेचा जन्म, मृत्यू अशा अनेक घटनांमुळे मालिकेत अनेक वर्षांनंतरचा प्रवास दाखवला जातो. तर तसेच या मालिकेत देखील एक मोठा बदल घडून येणार असून ही मालिका रात्री ९:३० च्या दरम्यान पाहायला मिळायची मात्र २० नोव्हेंबर पासून ही मालिका रात्री १० वाजता पाहायला मिळेल.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला असून या मालिकेत २५ वर्षाचे लिप दाखवल्यामुळे आत्ता या मालिकेतील काही जुनी पात्र प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. मालिकेत पुढे काय घडणार? हे जाणून घेण्याची उत्सुकता दिवसागणिक वाढत चालली आहे. शालिनीचा डाव यशस्वी होणार असला तरी खऱ्या प्रेमाचा कधीच अंत होत नाही. यावर आधारित त्यांची प्रेमकथा पुढे कशी फुलणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे. तर आता मालिकेत जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्मचा नवा अध्याय लवकरच सुरू होणार आहे.
View this post on Instagram
वर्षा उसगांवकर, मंदार जाधव, गिरिजा प्रभू, माधवी निमकर, मीनाक्षी राठोड, सुनील गोडसे, कपिल होनराव, गणेश रेवडेकर या कलाकारांनी मालिकेतील पात्र अगदी उत्तमरित्या साकारली. पण मालिकेत आलेल्या तब्बल २५ वर्षांच्या लिपमुळे यामधील बऱ्याच कलाकारांचा प्रवास इथेच संपणार आहे. मालिकेच्या नव्या कथानकात आता काही पात्र झळकणार नसल्याचे बोलले जात आहे.
या मालिकेतील कारस्थानी बायको आणि साधाभोळा नवरा म्हणजेच शालिनी व मल्हार यांची जोडी प्रेक्षकांना देखील चांगलीच आवडली. पण आता ही जोडी या मालिकेमध्ये दिसणार नाही. गेली अनेक वर्ष माधवीने शालिनी हे पात्र इतके उत्कृष्ट रंगवले की तिच्या अभिनयाचा सर्वत्र गौरव करण्यात आला. खलनायिकेचे पात्र साकारून सुद्धा ती लोकांना प्रचंड आवडू लागली होती. पण आता ही जोडी मालिकेत दिसणार नाही यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तसेच गौरी व जायदीप यांच्या पुनर्जन्मानंतर मालिकेत खलनायक किंवा खलनायिका म्हणून कोण असणार याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.