छोट्या पडद्यावरून अनेक कलाकार रसिक प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचतात. काही कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या काही भूमिका तर इतक्या गाजतात की, मालिका अथवा शो संपला तरी कलाकारांनी साकारलेली ती भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून राहते. अशीच एक मालिका म्हणजे कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका. या मालिकेतून सर्वांचा लाडका अभिमन्यू म्हणजेच अभिनेता ‘समीर परांजपे’च्या लोकप्रियतेत चांगलीच वाढ झाली.
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने आता निरोप घेतला असला तरी या मालिकेतील लतिका हे पात्र साकारणारी अक्षया नाईक आणि अभिमन्यू आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यामुळे ते पुन्हा कधी दिसणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. तर आता काही दिवसांपूर्वीच समीर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण यावेळी तो एक अभिनेता म्हणून नाही तर गायक म्हणून समोर आला. त्यामुळे सर्वांना आनंदाचा धक्काच बसला. समीर ‘सूर नवा ध्यास नवा-आवाज तरुणाईचा’ या नव्या शोमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करायला आणि मन जिंकायला आला आहे. आतापर्यंत त्याने गायलेल्या गाण्यांना प्रेक्षकांनी आणि परीक्षकांनी देखील खूपच चांगला प्रतिसाद दिला आहे.
सूर नवा ध्यास नवा या शोमध्ये मराठी सिनेसृष्टीतील आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजे अशोक सराफ आणि निवेदिता सराफ पाहायला मिळाले.
या आठवड्यात या दिग्गज कलाकारांनी आणि या सुंदर जोडीने भेट दिल्यामुळे कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली. यावेळी अशोक मामा आणि निवेदिता सराफ यांनी समीरचे भरभरून कौतुक केले. त्यावेळचा समीरचा हा अनुभव त्याने त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. समीरने नुकतीच एक खास पोस्ट त्याच्या इंस्टाग्रामवरून शेअर केली. त्याने एकूण पाच फोटो शेअर केले, त्यापैकी पहिल्या फोटोमध्ये सूर नवा ध्यास नवाच्या मंचावरील समीरचा फोटो आहे. दुसऱ्या फोटोमध्ये तो अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये समीर त्याच्या गुरुंसोबत दिसत आहे. चौथ्या फोटोमध्ये वीणा आहे, तसेच शेवटच्या फोटोमध्ये अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांनी समीरचे कौतुक केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट आहे.
समीरने हे सुंदर फोटो पोस्ट करत लिहिले की, “आजचा एपिसोड, आजचं गाणं माझ्या आयुष्यातला तो क्षण आहे जो आयुष्यभर कायम अत्तरासारखा मनात दरवळत राहील आणि मला कायम विचारत राहील, गाणं करतोयस ना?
शूटींग सुरू झालं, अशोक मामांची आणि निवेदिता ताईंची एन्ट्री झाली आणि मला बघून अशोक मामा म्हणाले अरे तू गातोस? मला वाटलं छान अभिनयच करतोस फक्त.. मी पाहिलंय तुझं काम.. छान करतोस काम.”
यावर समीरच्या मनात आलेल्या भावना त्याने मांडल्या. त्याने लिहिले की, “ते मला ओळखतात, त्यांनी माझं काम पाहिलंय हा माझ्यासाठी अभिनेता म्हणून अभिमानाचा क्षण होता. हो अभिमानच..गर्व म्हणा हवं तर.. आणि का नसावा? रविवारी दुपारी ४ वाजता दूरदर्शनवर लागणाऱ्या ह्यांच्या फिल्म्स बघत मोठे झालो आणि आज पहिल्यांदा ते भेटतात आणि हे बोलतात अजून काय हवं एखाद्या नवीन अभिनेत्याला.” तसेच त्याने पुढे लिहिले की, “या एपिसोडला गाणं ही ते मिळावं जे मला माझ्या गुरुंनी जवळपास २० वर्षांपूर्वी शिकवलं होतं.. प्रोमो बघून नीलूताईंचा आशीर्वादरुपी मेसेज यावा @neelkantipatekar कृतज्ञता, रितेपण आणि वनवास संपल्याचा आनंद हे सगळं जगलोय मी.” सरतेशेवटी समीरने लिहिले की, “एपिसोड बघा आणि एक आशीर्वाद नक्की द्या. ‘जीते रहो गाते रहो.’”
समीरच्या या पोस्टवर निवेदिता सराफ यांनी कमेंट करत लिहिले की, “असाच गात रहा, कधीही गाणं सोडू नकोस खूप खूप शुभेच्छा.” तसेच अनेकांनी या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्स करत शोमधील पुढील वाटचालीसाठी समीरला शुभेच्छा दिल्या आहेत.