प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य भाग म्हणजे मालिका. मागील काही वर्षांपासून मालिकांच्या कथेने एक नवीन वळण घेतले आहे. दिवसेंदिवस बदलत जाणारे विचार आणि त्या सोबत कथांमध्ये होणारा बदल देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
सध्या मालिका क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेतील मालिका म्हणजे स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते‘ ही मालिका. सुरुवातीला एक साधी राहणी असलेल्या आईची गोष्ट आता मात्र वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. प्रेक्षकांना देखील ही मालिका खूपच भावली आहे. त्यामुळे ही मालिका अनेक आठवड्यांपासून टीआरपीच्या उंच शिखरावर आहे.
या मालिकेत अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने आई ही प्रमुख भूमिका साकारली आहे. तर आता या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आला आहे. या मालिकेतील आई म्हणजेच ‘अरुंधती’ने इतक्या वर्षांच्या संसारानंतर पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातला आहे. त्यामुळे मालिकेत लग्नाची धामधूम सुरु आहे. पण कथेवरून या मालिकेवर अनेकांनी टीका केली. त्यामुळे मालिकेतील कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे.
तर ट्रोलर्सना उत्तर देत मधुराणी प्रभुलकर हिने एक पोस्ट शेअर केली आहे.
मधुराणीने अरुंधतीचे सुंदर फोटो असलेल्या व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “अरुंधतीचं लग्न….हे व्हावं की नाही… ? ह्या वयात लग्न करावं का…? केलं तर ते इतकं साजरं करावं का ? अशी विविध स्तरावर समाजात चर्चा झाली, होतेय. अनेकांना ह्यात आनंद होतोय तर काही जणांना मान्य होत नाहीये.पण मला नक्की असं वाटतं की, कुणाही एकट्या व्यक्तीला कोणत्याही वयात आपल्याला आवडलेल्या व्यक्तीबरोबर लग्न करण्याचा अधिकार आहे. ते प्रौढ वयात होतंय, किंवा दुसरेपणाचं आहे म्हणून लपून छपून, साधेपणाने करावं असं का ? लग्न आहे ते… साजरं करावं. हा इतका प्रागतिक विचार करणाऱ्या आमच्या वाहिनीचे स्टार प्रवाहचे आणि आमच्या प्रोजेक्ट हेड नमिता नाडकर्णीचे आणि दिग्दर्शक रवींद्र करमरकर ह्यांचे खरोखर धाडस आहे आणि अतिशय कौतुकास्पद आहे.”
मधुराणीच्या या पोस्टवर अनेकांनी सहमती दर्शवत तिला पाठिंबा दिला आहे.