‘होणार सून मी ह्या घरची’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ‘तेजश्री प्रधान.’ या मालिकेतून तेजश्री प्रसिद्धीच्या झोतात आली. अनेक वर्षांपूर्वी संपलेली ही मालिका आणि या मालिकेतील सर्वांची लाडकी जान्हवी आजही लक्षात आहे.
स्टार प्रवाहवर नुकतीच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाची गोष्ट‘ या मालिकेतून तेजश्री वर्षभरानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारत असून तिच्या पात्राचं नाव ‘मुक्ता’ असे आहे. तर यापूर्वी तिने ‘अग्ग्बाई सासूबाई’ ही मालिका केली होती. त्यामुळे मालिकांमध्ये तेजश्रीला पाहायला प्रेक्षकांना भारीच आवडते.
२ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०२३ चे टीआरपी रेटिंग नुकतेच समोर आले आहेत. ‘ठरलं तर मग’ या मालिकेने या रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवत, आघाडी गाठली आहे. तर त्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर नाव कोरलेल्या मालिकेने सर्वांचे होश उडवले आहेत. कारण ही मालिका म्हणजे तेजश्रीची ‘प्रेमाची गोष्ट.’ अवघ्या मोजक्या दिवसात या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे. तर अगदी कमी काळात प्रेक्षकांनी या मालिकेला दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत तेजश्रीने एक खास पोस्ट तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केली आहे.
तेजश्रीने ‘आज थोडं व्यक्त व्हावसं वाटलं…’ असा फोटो पोस्ट करत तिच्या मनातील भावना चाहत्यांसमोर मांडल्या. तेव्हा तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “कसे आणि कुठल्या शब्दात आभार मानू? तब्बल अडीच वर्षानंतर टेलिव्हिजनवर पुन्हा परतले. तुमच्यातलं कोणीतरी अचानक समोर येतं आणि पटकन म्हणतं, ‘आम्हाला तू आमच्या घरातलीचं वाटतेस टिव्हीमधे पाहिल्यावर’. तेचं आपलं घरातलं माणूस अडीचं वर्षानंतर परत यावं. आपण त्याच्या गेल्या दिवसापासून परत येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून रहावं आणि घरी परतलेल्या ‘त्या’ माणसाला तुमचे ते वाट पाहणारे डोळे पाहून भरूनचं यावं. तसचं काहीस माझ्या मनाचं झालयं, आज पहिल्या भागाला तुम्ही दिलेला प्रतिसाद कळल्यानंतर.”
तसेच तिने पुढे लिहिले की, “इतकी वर्षे कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले. पडले, धडपडले, पुन्हा उठले. आधाराला फक्त काम होतं. शाश्वत फक्त काम होतं, इतकी वर्षे त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं. सांगावसं वाटलं.”
View this post on Instagram
सरतेशेवटी तेजश्री प्रधान ने लिहिले की, “मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता, जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मी साठी, कधी जान्हवी साठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्ता साठी ढळतो.. आणि हिचं जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे. या पुढे ही देत राहील. पुन्हा एकदा मनापासून आभार. असंच कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी #HappyLife आहेचं.”
तेजश्रीसह या मालिकेत राज हंचनाळे, इरा परवाडे हे देखील प्रमुख भूमिका साकारत आहेत. खूप दिवसांनी मालिकेतून प्रेक्षकांना भेटायला आल्यामुळे तेजश्रीचे चाहते प्रचंड खुश आहेत.