जसजसे आपण नव्या दशकात प्रवेश करतो तसे मनोरंजन सृष्टीतही आपण बदल पाहत आहोत. नाटकांपासून सुरु होणारा मराठी मनोरंजन सृष्टीचा प्रवास आता कुठे तरी कमी झालेला दिसत असताना, अशावेळी रंगभूमीवर गाजलेले नाटक म्हणजे ‘संगीत देवबाभळी.’
अभिनेते प्रशांत दामले, भरत जाधव, संकर्षण कऱ्हाडे, प्रसाद खांडेकर अभिनेत्री विशाखा सुभेदार, मुक्ता बर्वे, कविता लाड यांसारख्या अनेक कलाकारांमुळे आज रंगभूमीवर येणाऱ्या नवोदित कलाकारांनाही प्रेरणा मिळत आहे. संगीत नाटकापासून दूर चाललेल्या कलाकारांना पुन्हा एकदा संगीत नाटकाशी जोडण्याचे काम भद्रकाली प्रोडक्शनच्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने केले. एकांकिका स्पर्धेपासून सुरु झालेल्या या नाटकाने २२ डिसेंबर २०१७ रोजी पहिल्यांदा रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर तब्बल ६ वर्षांनी या नाटकाचा प्रवास काल २२ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या ५०० व्या शेवटच्या प्रयोगासोबत थांबला.
‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचे निर्माते ‘प्रसाद कांबळी’ आहेत. या नाटकामुळे संत तुकारामांचे अभंग ओठांवर रुळू लागले. या नाटकातील संगीत आपल्याला वारंवार ऐकायला मिळावे अशी अनेक नाट्यप्रेमींची इच्छा होती. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे कारण, लवकरच प्रेक्षकांना संगीत देवबाभळी मधील तुकारामांच्या ओवी ऐकायला मिळणार आहेत. तर या नाटकातील ओवी, गाणी येत्या जानेवारीपर्यंत प्रेक्षकांकडे पोहोचणार आहे. प्रसाद कांबळी यांनी नाटकाचा ५०० वा म्हणजेच शेवटचा प्रयोग होत असताना माहिती दिली. तसेच त्यांनी सांगितले की, या नाटकाचे प्रयोग डिजिटल स्वरुपात देखील साठवण्यात येणार आहे.
बुधवार, दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह, सायन, मुंबई येथे संगीत देवबाभळी या नाटकाचा ५०० वा प्रयोग संपन्न झाला. रसिक मायबाप प्रेक्षकांनी शेवटची संधी न हुकवता या नाटकाच्या प्रयोगाला उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे ५०० वा प्रयोग मोठ्या दिमाखात पार पडला. तसेच या नाटकाला अनेक कलाकार मंडळींनीही उपस्थिती दर्शवली. यात महेश एलकुंजवार, महेश लिमये, ओम राऊत, जिंतेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव, संदीप पाठक, भीमराव मुडे, सोनाली कुलकर्णी, अनिता दाते यांचा समावेश होता.
शेवटच्या प्रयोगावेळी संगीत देवबाभळीची संपूर्ण टीम भावूक झाली. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख म्हणाले की, “आजचा सोहळा नसणे हाच सोहळा आहे. सकाळी आवलीला निरोप पाठवला की, इंद्रायणीमध्ये पाय सोडशील ते शेवटचे. लखुबाईला निरोप पाठवला की, आज गाठोडे बांधशील तेव्हा काहीच मागे राहणार नाही असे बांध आणि जा…. कारण हे शेवटचे गाठोडे आहे.”
तर अभिनेत्री शुभांगी सदावर्ते म्हणाली की, “२०१५ पासून माझ्यात जी आवली जन्माला आली तरी खूप मोठी झाली. महाराष्ट्रासाठी आवलीची नाळ तुटली आहे, पण आवली माझ्यात रुजली आहे. आज आनंद आहे ५०० प्रयोगांचा पण दुःख आहे की, महाराष्ट्रासाठी इथे थांबत आहोत.”
“आमच्या ध्यानीमनीही नव्हते की, महाराष्ट्र आमच्यासाठी टाळ्या वाजवेल. देवबाभळीच्या प्रयोगांसाठी अनेक दिग्गज आले. त्यांनी भरभरून कौतुक केले. देवबाभळीचा काटा जन्मभर तुमच्या आणि आमच्या काळजात रुतत राहील.” असे मनोगत संगीतकार आनंद ओक यांनी मांडले.