३० जून २०२३ रोजी केदार शिंदे यांचा प्रदर्शित झालेला ‘बाईपण भारी देवा’ हा सिनेमा महाराष्ट्रातच नाही तर देशभरात प्रचंड गाजला.
नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ नंतर भरघोस कमाई करणारा बाईपण भारी देवा हा मराठी सिनेसृष्टीतील दुसरा सिनेमा. सहा बहीणींच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात रोहिणी हट्टंगडी, सुचित्रा बांदेकर, दीपा परब, शिल्पा नवलकर, वंदना गुप्ते, सुकन्या मोने या अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसल्या. जवळपास दोन महीने हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. त्यामुळे या सिनेमाचे यश हे फक्त सिनेमाच्या टीम पुरते मर्यादित न राहता मराठी सिनेसृष्टीसाठी देखील अभिमानास्पद गोष्ट आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या प्रसिद्धीत आणखीन भर पडली. त्यामुळे सध्या कलाकारांसोबतच त्यांचेदेखील प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक पाहायला मिळाले. ‘बाईपण भारी देवा’च्या या अभूतपूर्व यशानंतर त्यांनी नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचा हा निर्णय इंस्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवला.
इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत त्यांनी त्यांच्या निर्णयाची घोषणा केली. त्यामुळे सध्या त्यांची ही स्टोरी चर्चेचा विषय ठरली आहे. कारण केदार यांनी अचानक इंस्टाग्रामवरून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. केदार यांनी अचानक हा निर्णय का घेतला? किती दिवसांसाठी घेतला? एखाद्या आणखी मोठ्या प्रोजेक्टसाठी त्यांनी हा ब्रेक घेतला असेल का? असे निरनिराळे प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले आहेत.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये केदार शिंदे यांनी लिहिले की, “एक लांबलचक सुट्टी घेतोय या इंस्टाग्रामवरून. तुमचं प्रेम आजपर्यंत मिळालं. पण, खरं सांगू? कुठेतरी थांबायला हवं, नव्या विचारांसाठी… बाय फॉर नाऊ!” अर्थातच मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणाऱ्या या लोकप्रिय दिग्दर्शकाने खूप विचार करूनच हा महत्त्वाचा निर्णय घेतला असावा. त्यामुळे ते आता पुन्हा परतताना काय घेऊन येणार याची वाट आता प्रेक्षक बघत आहेत.
केदार शिंदे यांनी आजवर ‘महाराष्ट्र शाहीर’ व ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमांसहीत इतर सिनेमाचे अपडेट ते स्वतः त्यांच्या इंस्टाग्रामवरून प्रेक्षकांपर्यंत पोहचवत होते. तसेच ते सोशल मिडीयावर देखील सतत सक्रिय असायचे परंतू मार्चच्या सुरुवातीस त्यांचे इंस्टाग्राम हॅक करण्यात आल्यानंतर त्यांनी नवीन अकाउंट चालू करून प्रेक्षकांच्या संपर्कात राहिले.