भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायिका म्हणजे आशा भोसले यांचा आज वाढदिवस. गेली ऐंशी वर्षे निरनिराळ्या संगीत रागांमध्ये गायन करत देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील रसिक प्रेक्षकांचे मन जिंकून घेणाऱ्या अष्टपैलू गायिका आशा भोसले यांनी १९४३ साली ‘चला चला नव बाळा’ हे पहिले मराठी गाणे गायले.
परंतू १९४८ मध्ये खऱ्या अर्थाने त्यांचे सिनेसृष्टीत पदार्पण झाले. तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा संगीत कलेचा प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे. बालकलाकरांपासून ते ज्येष्ठ कलाकरांपर्यंत सर्वच कलाकार मंडळी एक आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहतात. आशा ताईंनी मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तामिळ, मल्याळम, इंग्रजी, रशियन अशा विविध भाषेत सोळा हजारांहून अधिक गाणी गायली.
यामध्ये आशा ताईंनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, लोकगीते, कव्वाली, पॉप अशा निरनिराळ्या संगीत प्रकारांचे गायन करत अष्टपैलुत्व म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर त्या स्वतः बनल्या. मेरा साया, झुमका गिरा रे , दम मारो दम , इन आँखो की मस्ती, कजरा मोहब्बतवाला, पिया तू अब तो आ जा, राधा कैसे न जले, जरा सा झूम लूं मैं, ले गयी ले गयी यांसारखी अनेक गाणी ऑल टाइम सुपरहिट झाली आहेत.
१९६० आणि १९७० च्या दशकात त्यांची अनेक गाणी प्रदर्शित झाली. तेव्हा त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आतापर्यंत त्यांनी एक हजारांहून अधिक सिनेमांसाठी गायन केले. हिंदी सिनेसृष्टीतील गायनासाठी त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार तर दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. २००० मध्ये भारत सरकारने आशा ताईं ना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. तर २००८ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. २०११ साली सर्वाधिक गाणी गाण्याचा विश्वविक्रमही त्यांच्या नावे आहे. तर २०२१ चा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देखील मिळाला आहे.
अशा या अष्टपैलू गायिकेला मानाचा मुजरा…