बॉलिवूडमधील अष्टपैलू अभिनेता ज्यांचं नाव घेतलं की कायम त्यांनी साकारलेल्या खलनायकाचे रूप समोर येतं, असे अष्टपैलू अभिनेते म्हणजे ‘आशुतोष रामनारायण नीखरा म्हणजेच आशुतोष राणा.’ आज त्यांचा वाढदिवस, चला मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया काही खास गोष्टी.
अभिनयासह निर्माते आणि लेखक असणारे आशुतोष यांनी मराठी, हिंदी, तेलुगू, कन्नड आणि तमिळ अशा वेगवेगळ्या भाषांमधील सिनेमांत काम केले आहे. सिनेमांव्यतिरिक्त त्यांनी अनेक हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले. मालिकाविश्वातील ‘स्वाभिमान’ या मालिकेतून त्यांनी त्यांची अभिनय क्षेत्रातील कारकीर्द सुरु केली. अभिनय क्षेत्रात येण्याआधी वकिलीमध्ये करिअर करावे असा त्यांचा मानस होता. तरी त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकून अभिनयाचे धडे गिरवले.
स्वाभिमान या पहिल्या मालिकेच्या वेळी निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी भेटण्यास बोलावले तेव्हा ते भट्टजींच्या पाया पडले, परंतू त्यांना त्यांच्या पायांना हाथ लावलेला अजिबात आवडत नसे. त्यमुळे त्यांनी क्रोधीत होऊन आशुतोष यांना सेटवरून बाहेर हाकललं. कारण विचारलं असता तेव्हा आशुतोष म्हणाले होते की, “मोठ्यांच्या चरणांना स्पर्श करणे हे माझे संस्कार आहेत, जे मी सोडू शकत नाही.” हे ऐकून महेश भट्ट यांनी त्यांना मिठी मारली आणि स्वाभिमान या मालिकेतील पहिली भूमिका त्यांना दिली. इथेच आशुतोष राणा यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी अनेक नकरात्मक भूमिका साकारल्या. असे असले तरी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षक खुश झाले. त्यामुळे खूप कमी काळात त्यांचा चांगलाच चाहता वर्ग निर्माण झाला.
पहिल्या मालिकेनंतर. ‘फर्ज’, ‘षड्यंत्र’, ‘कभी कभी’ ‘वारीस’ या शोमधून आशुतोष यांनी सुरुवातीलाच चांगलीच लोकप्रियता मिळवली. २००४ सालच्या ‘परदेसी रे’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. ‘दुश्मन’ आणि ‘संघर्ष’ या सिनेमातील आशुतोष यांच्या भूमिका कधीही विसरण्यासारखं आहे. त्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार आणि झी सिने पुरस्कार यांसारख्या नावाजलेल्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीमध्ये देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले आहे.
२५ मे २००१ रोजी आशुतोष लग्नबंधनात अडकले. ९० च्या दशकात मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील गाजलेली अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. रेणुका यांना पहिल्या विवाहात अपयश आल्याने त्यांनी आशुतोष यांच्यासोबत दुसरा विवाह केला. तर आता रेणुका आणि आशुतोष यांच्या लग्नाला २० हून अधिक वर्षे पूर्ण झाली असून त्या दोघांना सूर्यमन आणि सत्येंद्र ही दोन मुले आहेत.