‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली गुणी अभिनेत्री म्हणजे सायली संजीव. त्याचबरोबर सायलीने सनी, बस्ता, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची असे विविध सिनेमे केले. तिचे प्रचंड चाहते आहेत. ती सोशल मीडियावर देखील नेहमीच तिचे वेगवेगळ्या अंदाजातले फोटोज् आणि तिच्या आयुष्यातील गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मागील काही महिन्यांपासून सायली प्रचंड चर्चेत आली. ना कोणत्या मालिकेमुळे ना कोणत्या सिनेमामुळे. तिच्या चर्चेचं कारण म्हणजे तिचं नाव लोकप्रिय क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड याच्या सोबत जोडले जात आहे. या अफवा असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यांच्या नात्याची चर्चा संपता संपत नाही.
त्यामुळे सायलीला ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागत आहे. कधी नेटकरी तिला वहिनी बोलतात तर कधी केवळ तिच्या पिवळ्या रंगाच्या ड्रेस पाहून थेट ऋतुराजचं नाव घेऊन मोकळे होतात. असे असूनही आत्तापर्यंत सायलीने अनेकदा ट्रोलर्सच्या प्रश्नांवर स्पष्टपणे उत्तरे दिली आहेत.
View this post on Instagram
तर आतापर्यंतच्या झालेल्या प्रकारावरून सायलीने पुन्हा एकदा ट्रोलर्सना अगदी प्रेमळ भाषेत समन्स बजावले आहे. सायली म्हणाली की, “काही दिवसांपूर्वी मी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधला एक फोटो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शेअर केला होता. या पोस्टवरच्या कमेंट्स वाचून मला भीती वाटायला लागली. आता पिवळे कपडे घालणंच बंद करावं लागणार की, काय असं वाटू लागलं. त्याचं (ऋतुराजचं) दुसऱ्या कोणाबरोबर लग्न होईल आणि माझं दुसऱ्या एकासोबत…तेव्हाच चर्चा बंद होतील.”
तसेच ती म्हणाली की, “अशा वेळी ‘नो कमेंट्स’ म्हणून आपण ती गोष्ट सोडून देऊ शकतो. मात्र, मला या गोष्टींना सामोरं जाणं महत्त्वाचं वाटतं. मी पळ काढत नाही. काहीच नसताना नाव जोडलं जातं, याचा वैयक्तीक आयुष्यात नक्कीच त्रास होतो. तुमची चूक नसताना या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. अफवांना किती प्राधान्य द्यायचं, हे स्वतःशी ठरवलं, की गोष्टी सोप्या होतात. आपण उगाच ट्रोल करतोय, हे ट्रोलर्सना कळावं, एवढीच इच्छा!”
यावरून तरी सायली आणि ऋतुराज यांच्यात अजूनतरी कोणतेही नाते नाही, हे सायलीने स्पष्ट केले आहे.