‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला गौरव मोरे, शिवाली परब, रोहित माने, प्रियदर्शनी इंदलकर आणि बरेच विनोदवीर मिळाले. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची संधी दिली.
त्यापैकीच एक म्हणजेच अभिनेता गौरव मोरे. महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या कार्यक्रमामुळे गौरव मोरे घराघरात पोहोचला आहे. गौरव फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून देखील ओळखला जातो.
गौरव मोरे हा प्रेक्षकांचा लाडका ठरला असून मराठी नाटक, सिनेमे आणि मालिकांमध्ये काम करण्यासोबतच हिंदी सिनेमांतही गौरवच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे. अभिनयामुळे आणि खास विनोदीशैलीमुळे चर्चेत राहणाऱ्या गौरवने हास्यजत्रा सोडल्याची सोशल मीडियावर सध्या चर्चा सुरुआहे. गेल्या काही दिवसांपासून गौरव महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात दिसत नसल्यामुळे त्याने कार्यक्रम सोडला का, अशा चर्चांना उधाण आलंआहे. मात्र ह्या सगळ्या अफवा असल्याच्या गौरवने स्वतः सांगितले आहे.
आता झालेल्या एका मुलाखतीत गौरव म्हणाला की, “मी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडलेली नाही. मला बरं वाटत नसल्यामुळे मी सुट्टीवर आहे. माझ्या खांद्याला दुखापत झाली असून मला डॉक्टरांनी काही दिवसांसाठी आराम करायला सांगितला आहे. म्हणून मी सध्या सुट्टीवर आहे. जेव्हा स्कीट सादर करतो, त्यावेळी बरीच ओढाताण होते. स्कीटमध्ये बरीच हालचाल असते; सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. मला डॉक्टरांनी खांद्यावर जास्त ताण देण्यास सांगितलेलं नाही. म्हणून मला डॉक्टरांनी थोड्या दिवसांसाठी आराम करायला सांगितलं आहे. मी मार्च महिन्यामध्ये पुन्हा हास्यजत्रेत सहभागी होईल.”
‘आय एम ए गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा’ हा गौरवचा डायलॉग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. या डायलॉगबरोबर गौरवची होणारी एन्ट्री त्याच्या केसांमुळे हिट ठरते. विनोदी शैलीबरोबरच त्याची केसांची हेअरस्टाईल देखील खूप लोकप्रिय आहे.
तसेच गौरवच्या कामाबद्दल सांगायच झाल तर तो बॉईज ४, लंडन मिसळ आणि आता तो प्रसाद ओकची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटात दिसणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित ‘परिनिर्वाण’ हा चित्रपट असणार आहे.