आपल्या लाडक्या कलाकारांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. एखादया मालिकेतील जोडी प्रेक्षकांना इतकी आवडते की ते खऱ्या आयुष्यात देखील त्या दोघांना एकत्र पाहण्याची स्वप्न पाहत असतात. एखादी मालिका येणे, त्यातील कलाकार, त्यांचा अभिनय, त्यांची मालिकेतील नाती सगळ काही प्रेक्षकांना आपलसं वाटू लागतं. मग ती मालिका २ महिने सुरु असुदे किंवा २ वर्ष, प्रत्येक पात्र आपल्याला आपल्या घरातील असल्यासरखे वाटू लागते. असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी खऱ्या आयुष्यात देखील मालिकेतील जोडीदारासोबत संसार थाटला आहे.
२०२० साली आलेल्या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आणि ती मालिका म्हणजे ‘फुलाला सुगंध मातीचा’. स्टार प्रवाहावर सुरु झालेली मालिका अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. दोन वर्ष ही मालिका प्रेक्षाकांचं मनोरंजन करण्यात कुठेच कमी पडली नाही. या मालिकेतील कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि शुभम म्हणजेच अभिनेता हर्षद अतकरी यांची जोडी चांगलीच प्रसिद्ध झाली होती, प्रेक्षकांनी देखील यांच्या जोडीला चांगलीच पसंती दिली होती. या मालिकेत कीर्तीला आय पी एस ऑफिसर बनायचं असतं आणि शुभम हा एक मिठाईचे दुकान चालवत असतो. पण आय पी एस होण्याआधीच किर्तीचं शुभम सोबत तिच्या इच्छेविरुद्ध लग्न होत. कीर्तीचे आई – वडिलांचं एका हल्ल्यात अपघाती निधन झालेलं असतं. त्यामुळे कीर्तीचं पोलीस व्हायचं स्वप्न असतं. पण तिचं लग्न होतं. आणि नंतर ती संसाराला लागते. तिची खाष्ट सासू आणि घरातील इतर मंडळी यांच्यासोबत कीर्ती कसं जुळवून घेते आणि हळूहळू घरातील सगळ्यांची मन कशी जिंकते हे दाखवण्यात आले आहे. नंतर शुभमच्या मदतीने आणि प्रोत्साहानाने कीर्ती आय पी एस ऑफिसर बनते हे सगळं या मालिकेत दाखवण्यात आले होते. आज मालिका बंद होऊन २ वर्ष उलटून गेली आहेत, पण तरीही आजही प्रेक्षक या मालिकेवर आणि मालिकेतील कलाकारांवर तितकंच प्रेम करतात. आजही प्रेक्षक कीर्ती आणि शुभमला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक असतात.
हर्षद सध्या ‘कुण्या राजाची गं तू राणी’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे, तर समृद्धी ही ‘मी होणार सुपर स्टार जोडी नंबर वन’ या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडत आहे. या कार्यक्रमात जोडीने नृत्य सादर केले जाते. त्यामुळे सूत्रसंचालन देखील जोडीनेच होते. या आधी समृद्धीसोबत स्टार प्रवाह वरील अनेक मालिकांमधील कलाकार सूत्रसंचालन करताना दिसून आले आहेत. तर आता हर्षद समृद्धी सोबत सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोघांना एकत्र पाहता येणार यामुळे प्रेक्षक प्रचंड खुश आहेत.