समंथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. समंथा ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. समंथाची दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी सोबतच बॉलीवूडमध्ये देखील चांगलीच क्रेझ आहे. ती तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच पर्सनल लाईफमुळे नेहमी चर्चेत असते.
अलीकडेच समंथा अल्लू अर्जुनच्या पुष्पा या सिनेमातील ‘ऊ अंटावा’ या आयटम सॉंगमध्ये दिसून आली होती. ‘ऊ अंटावा’ने समंथाची लोकप्रियता कमालीची वाढवली आहे. हे गाणे समंथासाठी टर्निंग पॉइंट ठरले. मात्र या गाण्याच्या वेळी समंथाच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले होते.
समंथाने प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य याच्याशी २०१७ मध्ये लग्न केलं होतं. मात्र, २०२१ मध्ये या दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. यानंतर समंथाने संपूर्णपणे तिच्या कामावर लक्ष केंद्रित केले. नुकत्याच एका मुलाखतीत तिने तिला मिळालेल्या ‘ऊ अंटावा’ या गाण्याबद्दल भाष्य केले आहे.
ती म्हणाली, “ज्यावेळी मला या गाण्याची ऑफर मिळाली त्यावेळी आमच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरु होती. आम्ही घटस्फोट घेतोय हे त्यावेळी सगळ्यांना सांगितलं. त्यावेळी, मी हे गाणं करु नये असं माझ्या कुटुंबियांना आणि जवळच्या व्यक्तींना वाटत होतं. अनेकांनी मला त्यावेळी सल्लेही दिले होते”, असं समंथा म्हणाली.
पुढे ती म्हणते, “तू घटस्फोट घेतेस आणि आयटम सॉग्स कसले करतेस? असा प्रश्न मला विचारला जात होता. मात्र, मी हे गाणं करणार असं ठामपणे सगळ्यांना सांगितलं. मी माझ्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी का लपवू?, मी काही चुकीचं तर करत नाहीये, मग मी उगाच अपराध्यासारखं का राहू?. मी माझ्या वैवाहिक जीवनात माझे १०० टक्के दिले होते, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे ज्या गोष्टी मी केल्याच नाहीत त्याची शिक्षा मी उगाच का भोगू?”
दरम्यान, समंथा लवकरच ‘शाकुंतला’ या तिच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तसेच ती ‘सिटाडेल’ या वेबसिरीजमध्ये देखील दिसणार आहे.