छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना नेहमीच प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत असतं. मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्री तर प्रेक्षकांना नेहमीच आपल्याशा वाटतात. अशीच एक प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणजे सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या माध्यमातून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री ‘अक्षया नाईक.’
या मालिकेत अक्षयाने लतिका ही भूमिका साकारून अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्यं केलं हे नक्की. त्यामुळेच तिच्या प्रोफेशनल लाईफ सोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. मराठीसह हिंदी मालिकेतून अभिनयाचा ठसा उमटवणारी अक्षया नाईक मराठी टीव्ही विश्वात ‘सुंदरा’ म्हणून लोकप्रिय झाली. ‘ये रिश्ता क्या काहलाता है’ या हिंदी मालिकेतून अक्षया प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर तिने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत लतिकाची भूमिका साकारली. यातील अभी- लतिका ही जोडी आणि त्यानंतर लतिका-देवा यांची जोडी प्रेक्षकांना विशेष आवडली.
एका वेगळ्या धाटणीची भूमिका साकारताना अभिनेत्री मालिकेच्या नावामुळे प्रेक्षकांसाठी ‘सुंदरा’ बनली. काहीच महिन्यांपूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यावेळी अभिनेत्रीने भावूक पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना अलविदा केले. त्यामुळे गेले काही दिवस चाहते त्यांच्या लाडक्या सुंदराला मिस करत होते. आता हीच लतिका एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने ही आनंदाची बातमी सर्वांसोबत शेअर केली आहे. दिलीप प्रभावळकर लिखित ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ या नाटकात एका गोड नात्यांची मिश्किल गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘चूक भूल द्यावी घ्यावी या नाटकाच्या माध्यमातून अक्षया पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांच्या सान्निध्यात आली.
तसेच ती सध्या एका वेगळ्याच कारणासाठी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरली आहे. अक्षयाने गोव्यामध्ये तिच्या बहिणीसोबत मिळून एका नव्या व्यवसायाला सुरुवात केली आहे. अक्षयाचं मूळ गाव गोव्यात आहे. त्यामुळे अभिनेत्रीने तिच्या बहिणीच्या साथीने गोव्यात हॉटेल क्षेत्रात पदार्पण केलं आहे. अक्षयाच्या गोव्यातील सुंदर बंगल्यात आता नागरिकांना भाडं भरून राहता येणार आहे. ‘नाईक होम स्टे’ असं तिने या बंगल्याचं नाव ठेवलं आहे.
तिने तिच्या सोशल मिडियावरून एक पोस्ट शेअर करत असं लिहिले की, “गोव्यातील आमचं छोटंसं घर आता तुमचं झालं आहे. रोजच्या आयुष्यातून ब्रेक घेऊन तुम्ही येथे निवांत सुट्टीचा आनंद घेऊ शकता. आमच्या नाईक होम स्टेमध्ये आजपासून तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आमचं हे घरगुती हॉटेल पणजीपासून ८ किलोमीटर दूर आणि करमाळी रेल्वे स्थानकापासून फक्त ३.२ किलोमीटर अंतरावर आहे. तुम्हा सर्वांचं माझ्या घरात स्वागत करण्यासाठी मी आतुरतेने वाट पाहतेय…”
अक्षयाचं नव्हे तर मराठी कलाविश्वातील निरंजन कुलकर्णी, अनघा अतुल, अभिज्ञा भावे, प्रार्थना बेहेरे, तेजस्विनी पंडित अशा असंख्य कलाकारांनी गेल्या काही दिवसांमध्ये व्यवसाय क्षेत्रात एक नवी भरारी घेतली आहे. अभिनय क्षेत्र सांभाळून या कलाकारांनी कपडे, हॉटेल, सौंदर्य प्रसाधनांशी संबंधित असे स्वत:चे वेगवेगळे व्यवसाय सुरू केले आहेत.
तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे व तिच्या पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्या.