सिनेसृष्टीत कलाकार करत असलेले काम म्हणजेच सिनेमा, मालिका, नाटके यांची जेवढी चर्चा होते, त्यापेक्षा अनेक पटींनी चर्चा होते ती त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलची. अभिनेत्री अक्षया देवधर आता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे.
डिसेंबरमध्ये अक्षया अभिनेता हार्दिक जोशीसोबत लग्नबंधनात अडकली. परंतू आता मात्र तिच्या लग्नाआधीच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले आहे. अक्षया आणि अभिनेता सुयश टिळक मागील काही वर्षे एकमेकांच्या प्रेमात होते. असे असूनही त्यांच्या नात्यात दुरावा येऊन ते वेगळे झाले. परंतू आजवर त्यांच्या नात्यात दुरावा का आला? याचा खुलासा आतापर्यंत झालेला नव्हता.
‘प्लॅनेट मराठी’च्या ‘त्या नंतर सगळं बदललं’ या कार्यक्रमात सुयशने दिलेल्या मुलाखतीत या सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. या कार्यक्रमादरम्यान त्याला विचारण्यात आले की, “तुमचे ब्रेकअप नक्की का झाले? आणि त्यानंतर पुढे काही बदल झाले का?” त्यावर सुयशने खूपच मनमोकळेपणाने उत्तर दिले.
सुयशने सांगितले की, “अक्षयाआधी मी एक अनुभव घेतला होता. माझ्याबरोबर हे पहिल्यांदा घडलं नव्हतं. पण अक्षयाबरोबर माझं नातं खूप चांगलं होतं. आमची मैत्री चांगली होती. शिवाय आम्ही एकमेकांना चांगलं समजून घेत होतो. तिच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणीतरी आलं आहे हे तिला जेव्हा जाणवलं तेव्हा तिने मला मैत्रीच्या नात्याने सगळं सांगितलं. तिच्या या निर्णयाचा मी आदर केला. मला हे नातं सोडून पुढे जावं लागलं.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “एखाद्या रिलेशनशिपमध्ये जर एकच व्यक्ती नातं ताणून धरत असेल तर त्या नात्याची दिशा बदलते. पण तुम्हाला ते त्यावेळी जाणवत नाही. मलाही तेव्हा ते जाणवलं नव्हतं. पण यासाठी मला कोणालाही जबाबदार ठरवायचं नाही. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडलं त्यासाठी मी कोणालाच दोषी ठरवलं नाही. तिच्या आयुष्यात माझा प्रवास तिथवरच होता. आम्ही समजुतदारपणे वेगळे झालो. आजही आमच्यामध्ये उत्तम मैत्री आहे. आम्ही एकमेकांना समोर बघू शकत नाही किंवा एकमेकांशी बोलू शकत नाही असं काहीच नाही.”
सध्याच्या घडीला त्या दोघांनी वेगवेगळ्या जोडीदारासोबत सुखाने संसार थाटला आहे