मराठी अभिनेता शरद केळकर याने आपल्या अभिनयाची छाप मराठी इंडस्ट्री बरोबरच बॉलीवूडवर देखील पडली आहे. त्याने कलाक्षेत्रात स्वतःचे वेगळेच स्थान निर्माण केले आहे. या क्षेत्रामध्ये त्याला १९ वर्ष झाली असून त्याने अनेक वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील त्याच्या अभिनयावर प्रचंड खुश असतो. त्याने ‘रामलीला’ या चित्रपटामध्ये बॉलीवूड ची लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण व अभिनेता रणवीर सिंह यांच्या सोबत काम केले होते. या चित्रपटामध्ये त्याने कांजी भाई ची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच त्याने एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्याने ‘रामलीला’च्या सेट वरील काही अनुभव सांगितले आहेत.
शरद केळकर याने मुलाखतीमध्ये असं सांगितल की, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची कला, त्यांचे विचार हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचे आहेत. त्यांचे कलेवर असलेले प्रेम मी माझ्या डोळ्यासमोर पाहिले आहे. जोपर्यंत त्यांना मनासारखा शॉट मिळत नाही तोपर्यंत ते उपस्थित सगळ्या कलाकारांकडून मेहनत करून घेतात.
शरद केळकर पुढे म्हणाला, ‘रामलीला’ मधील एका गाण्याचे शूटिंग फिल्मसिटीमध्ये सुरु होते. पहिल्याच दिवशी त्या सेटवर मुख्य कलाकारांसह जवळपास १ हजार डान्सर्स उपस्थित होते. गाण्याचे शूट सुरु असताना सेटवरील लांबचा एक दिवा विझल्याचे संजय सरांनी पाहिले. दुसऱ्या एखाद्या दिग्दर्शकाने जाऊदे अजून ५० दिवे आहेत असा विचार करून शूट तसेच सुरु ठेवले असते परंतु, संजय लीला भन्साळींनी आणखी एक टेक घेऊया सांगत ‘तो एक दिवा विझलाय…आधी लावा’ असे सांगितले होते. एवढी लहानशी चूक दुरुस्त करीत त्यांनी गाण्याचे शूटिंग नव्याने सुरु केले. तेव्हा मला त्यांच कलेवर किती प्रेम आहे हे कळाले.
‘गाण्याची रिहर्सल करण्यासाठी आमच्याकडे एक दिवसाहून अधिक वेळ होता. मला तेव्हा वाटले हे लोक किती पैसे वाया घालवतात एवढ्यात एखाद्या मालिकेचे १३ ते १५ मिनिटांचे शूटिंग पूर्ण झाले असते. पण, जेव्हा या सगळ्या शूटिंगनंतर मी चित्रपट पाहिला तेव्हा मी संजय सरांना मिठी मारली होती.’ , असे अभिनेता शरद केळकर म्हणाला.