मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते म्हणजे ‘केदार शिंदे (Kedar Shinde). मागील काही दिवसांत दिग्दर्शन क्षेत्रात सर्वाधिक गाजलेलं नाव म्हणजे केदार शिंदे. ‘अगं बाई अरेच्चा’, ‘जत्रा’, ‘मुक्काम पोस्ट लंडन’, ‘गलगले निघाले’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘अगं बाई अरेच्चा २’, ‘महाराष्ट्र शाहीर’ आणि ‘बाईपण भारी देवा’ यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनातून सिनेसृष्टीला मिळाले.
केदार, भरत आणि अंकुश यांच्या मैत्रीचं त्रिकुट
केदार यांच्या सिनेमाप्रमाणे त्यांची आणखी एक गोष्ट सिनेसृष्टीत गाजली ती म्हणजे केदार शिंदे, भरत जाधव आणि अंकुश चौधरी यांची मैत्री. जसं सिनेमाचं नाव घेतलं की कलाकार आणि दिग्दर्शक नजरेसमोर येतात, यांचंही तसंच आहे. एकाचं नाव घेतलं तरी त्यांच्या मैत्रीचा विषय निघाल्याशिवाय राहत नाही. तर केदार, भरत आणि अंकुश हे त्रिकुट २५ हून अधिक वर्षे एकत्र आहे. त्यामुळे त्या तिघांनी अनेकदा एकत्रित काम केले.
दिग्दर्शक म्हणून केदार यांना अनेकदा विचारण्यात आले होते की, “तुम्ही तुमच्या सिनेमांसाठी तुमच्याच मित्रांना निवडतात.” त्यावर केदार यांचे मत होते की, ते भूमिकेनुसार पात्र निवडतात आणि बहुतेकदा त्यात माझे मित्र एकदम छान बसतात. १५ ऑगस्ट २००२ साली रंगमंचावर आलेले सही रे सही नाटक आज २०२४ मध्येही रंगमंचावर जोरदार सुरु आहे. त्यामागे प्रेक्षकांचे प्रेम आहेच शिवाय यामागे खरा हात आहे तो म्हणजे केदार आणि भरत जाधव यांच्या मैत्रीचा. केदार, भरत आणि अंकुश यांच्या मैत्रीची अशी अनेक उदाहरणे आहेत.
बायकांच्या मनाचा अचूक ठाव घेणारे दिग्दर्शक
बायकांचं मन कोणालाच ओळखता येत नाही असं सर्वांनाच वाटतं. पण या गोष्टीला एकच अपवाद समजले जाते, ते म्हणजे केदार शिंदे. याचे कारण म्हणजे आजवर त्यांनी अनेक विषयांवर सिनेमे, मालिका केल्या. पण बायकांच्या मनाचा अचूक ठाव घेऊन, ते सिनेमात उतरवणं आणि त्याची महिला वर्गालाच नाही तर संपूर्ण प्रेक्षकवर्गाला भुरळ घालतात. या विषयावरील केदार यांचे २ सिनेमे प्रचंड गाजले, ते सिनेमे म्हणजे २००४ सालचा ‘अगं बाई अरेच्चा’ आणि नुकताच लोकप्रियतेचा शिखर गाठलेला २०२३ चा ‘बाईपण भारी देवा.’ या सिनेमांतून केदार यांनी महिलांना जग पाहण्यासाठी आणि जगाला महिलांकडे पाहण्यासाठी नवा दृष्टीकोन दिला. त्यामुळे बाईचं मन अचूक टिपणारे दिग्दर्शक केदार शिंदे अशी नवी ओळख त्यांना मिळाली.
मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदा केले आयटम सॉंग
मराठी सिनेसृष्टीत आज अनेक प्रयोग होत असले तरी काही वर्षांपूर्वी मराठी सिनेमात कधीच आयटम सॉंगचा प्रयोग झाला नव्हता. हा प्रयोग पहिल्यांदा झाला तो केदार शिंदे यांच्या अगं बाई अरेच्चा या सिनेमातच. मराठी सिनेमात हिंदी गाणं आणि तेही आयटम सॉंग असणारा हा मराठी सिनेसृष्टीतील पहिला सिनेमा. या आयटम सॉंगमध्ये बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनाली बेंद्रे थिरकली असून या डान्सची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान यांनी केली होती. केदार यांनी सांगितल्यानुसार राज ठाकरे यांच्यामुळे सोनाली बेंद्रे आणि फराह खान यांनी या सिनेमाला होकार दिला होता.
अशाच निरनिराळ्या प्रयोगांतून केदार शिंदे कायम मराठी सिनेसृष्टी उंचावर नेण्यासाठी प्रयत्नशील असतात.