सर्वांची आवडती विनोदी मालिका म्हणजेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’. या मालिकेमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढा व निर्माते असित मोदी यांच्यात नेहमीच वाद चालू असतात. शैलेश लोढा हे अनेकदा निर्मात्यांवर टीका करताना दिसून येतात. त्यांच्या या वादामुळे शैलेश लोढा यांनी मालिका देखील सोडली. पण त्या वादाच व मालिका सोडल्याच खर कारण त्यांनी अजूनही स्पष्ट केल नाही.
गेल्या अनेक वर्षापासून शैलेश लोढा हे तारक मेहता ची भूमिका साकारात होते. पण काही कारणांमुळे त्यांनी गेल्या वर्षी एप्रिल मध्ये ही मालिका सोडली. असित मोदी यांनी एक वर्षापासूनची थकबाकी अजूनही दिलेली नसून शैलेश यांनी ६ वर्षानंतर असित मोदींच्या प्रॉडक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शैलेश लोढा यांना वेळेत पगार न मिळाल्याने असित मोदी यांच्या प्रॉडक्शन कंपनीविरुद्ध त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. शैलेश नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलमध्ये गेले आणि कलम ९ अंतर्गत त्यांनी तक्रार दिली. सध्या हे प्रकरण न्यायालयात आहे. याची सुनावणी मे महिन्यात होणार असून सध्या ते यावर काहीही बोलणार नाहीत असं त्यांनी सांगितल आहे.
असित मोदी यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, परंतु शोचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी म्हणाले, “आम्ही त्यांना मेल आणि कॉलद्वारे सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याची आणि त्यांचा उर्वरित पगार घेण्याची विनंती केली होती. आम्ही त्याला पगार देण्यास कधीच नकार दिला नाही. प्रत्येक कंपनीत नोकरी सोडल्यानंतर पेपरवर्क केले जाते. त्यांनी इकडे-तिकडे तक्रार करण्याऐवजी साधी पद्धत फॉलो केली असती, तर बरं झालं असतं. आम्ही त्यांचा पगार देण्यास नकार दिलेला नाही. कागदपत्रांवर सह्या करून त्यांनी त्यांचा पगार घेऊन जावं, असं आम्ही त्यांना कळवलं आहे.”