तब्बल ९ वर्षानंतर मिटला ‘सलमान आणि अरिजित’चा वाद, पुन्हा आले एकत्र…
३६५ दिवस बॉलिवूडमध्ये कोणाचे ना कोणाचे वाद, रुसवा-फुगवा सुरूच असतो. परंतू अनेक वर्षांपूर्वी झालेला असाच वाद जो चाहत्यांच्या आजही लक्षात आहे तो झाला होता भाईजान आणि लोकप्रिय गायक अरिजित सिंग यांच्यात.
२०१४ साली पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन म्हणून पुरस्कार स्वीकारण्यासाठी अरिजित सिंग जेव्हा स्टेजवर आला तेव्हा सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असणाऱ्या सलमान खानसोबत अरिजितची शाब्दिक चकमक झाली अन् त्यातूनच त्यांच्या वादाला तोंड फुटले. त्यामुळे नाराज असलेल्या सलमानला मनवण्यासाठी अरिजितने अनेक प्रयत्न केले. तसेच त्याच्या व्यतिरिक्त सिनेसृष्टीतील अनेकांनी त्यांचा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. परंतू त्यांचा वाद संपता संपेना.
उलट अवघ्या २ वर्षांनी हा वाद तितकाच भडकलेला आहे हे प्रेक्षकांसमोर देखील आले. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेला सलमानचा ‘सुलतान’ हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील ‘जग घूमिया’ हे गाणे अरिजितकडून करून घेण्याचा निर्णय पक्का झाला होता. परंतू सलमानच्या सांगण्यावरून हे गाणे राहत फतेह अली खान यांना देण्यात आले. त्यामुळे सलमानने अरिजितच्या तोंडचा खास काढून घेतला असला तरी त्याने तेव्हा देखील सोशल मीडियावर पुन्हा एकदा जाहीर माफी मागितली. परंतू त्याच्या बाजूने वाद मिटवण्याचा हा शेवटचा प्रयत्न होता हे ही स्पष्ट केले होते. तरी देखील इतक्या वर्षांत त्यांच्यात दुरावा कायम होता.
आता मात्र सलमान आणि अरिजितच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण या दोघांचा वाद आता पूर्णपणे संपला यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीच्या काही दिवसात सलमानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधून बाहेर पडताना अरिजितला पाहिले आहे. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांच्या वादानंतर यांच्यात नक्की शिजतंय तरी काय? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. पण आता ‘टायगर ३’ या सलमानच्या आगामी सिनेमामुळे यांची पुन्हा एकदा गाठ पडली आहे.
टायगर ३ या सिनेमातील ‘लेके प्रभू का नाम’ हे पहिले गाणे आज प्रदर्शित झाले आहे. या गाण्यासाठी रुपेरी पडद्यावर सलमानसोबत कतरिना कैफ झळकली आहे. तर हे गाणे अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायले आहे. त्यामुळे सलमान आणि अरिजितचे चाहते खूपच खुश झाले आहेत.