जेवताना तोंडी लावायला एखादा पदार्थ लागतोच तसाच मागील काही वर्षांपासून आपल्या सवयीतील शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या.’ “कसे आहात मंडळी? मजेत ना? आणि आपला नेहमीचा, आपुलकीचा प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे.” या वाक्याने अनेक वर्ष प्रेक्षकांना वेड लावले आहे.
फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगभरात चला हवा येऊ द्या या शोने चांगलीच लोकप्रियता मिळवली. इतकी की हा शो आता तब्बल ९ वर्षे चालला. २०१४ साली ‘फू बाई फू’ या शोने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुखच्या ‘लयभारी’ या सिनेमाच्या निमित्ताने हा शो सुरु झाला. सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे याने देखील या शोमधूनच नावलौकिक केले. तसेच या शोमधील कुशल बद्रिके, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे हे सर्व कलाकर या शोमधून प्रसिद्धीच्या झोतात आले.
View this post on Instagram
चला हवा येऊ द्या या शोने सर्वाना काही ना काही दिले. रसिक प्रेक्षकांना कधी खळखळून हसवले तर कधी हृदयस्पर्शी गोष्टींनी चटकन डोळ्यात पाणी आणले, तर कधी अगदी सहज हसत-खेळत समाज सुधारणेचा सल्ले देणारे चिमटे काढले. या मंचावरून कायमच कोणत्या ना कोणत्या मालिकेचे अथवा सिनेमाचे प्रमोशन केले गेले. या शोमध्ये मराठी सिनेसृष्टीतीलच नाही तर बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार देखील दिसले. प्रसिद्धीच्या जोरावर बॉलिवूडमधील देखील अनेक कलाकारांना आपल्या मराठी रंगमंचाची मदत घ्यायला भाग पाडलं. त्यामुळे या शोची जगभरात लोकप्रियता वाढली. आणि यातूनच या शोसाठी परदेशवारी देखील होऊ लागली.
या शोमध्ये सामील होणाऱ्या प्रत्येकालाच एक नवी ओळख देण्याचे काम या शोने केले. परंतू आता मागील काही महिन्यांपासून मात्र या शोची हवा पाहिजे तशी वाहत नसल्यामुळे झी मराठी वाहिनीने हा शो तूर्तास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक प्रयत्न करूनही या शोच्या टीआरपीमध्ये अजिबात वाढ न होता, याउलट गाठलेल्या तळामुळे या शोचा शेवटचा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. या शोची निरीपाची वेळ जवळ आली आहे असे स्वतः निलेश साबळे याने जाहीर केले.
यावेळी निलेश साबळे म्हणाला की, “चला हवा येऊ द्या हा शो आता थांबत आहे, पण प्रेक्षकांच्या तो कायम मनात असेल. गेल्या नऊ वर्षात या शोने जवळपास एक हजाराहून अधिक भाग केले आहेत. माझ्यासह सगळ्या टीमला या शोने नाव, ओळख मिळवून दिली आहे, आर्थिक स्थिरता दिली आहे. तूर्तास थांबण्याची वेळ आली असल्याचे वाहिनीने सांगितले आहे. पण कदाचित सहा सात महिन्यानंतर आम्ही नवे पर्व घेऊन येऊ अशी शक्यता वाटते.”
सध्या जरी हा शो प्रेक्षकांचा निरोप घेत असेल तरी, कायम प्रेक्षकांच्या मनात राहणार यात मात्र शंका नाही. तर दुसरीकडे या शोच्या दुसऱ्या पर्वाची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतील हे ही तितकेच खरे.