बेला शेंडे यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायलेलं अप्सरा आली हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्यामुळे मराठी सिनेसृष्टीतीला अप्सरा मिळाली. म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) अप्सरा आली या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली असली तरी, तिच्या अभिनयाने देखील प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला.
सोनालीने केदार शिंदे यांच्या बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. तिचा पहिलाच सिनेमा इतकका गाजला की, त्यासाठी तिला अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यानंतर तिने इरादा पक्का, क्षणभर विश्रांती, नटरंग, झपाटलेला २, मितवा, क्लासमेट्स, हिरकणी, झिम्मा, पांडू यांसारख्या अनेक सिनेमात काम केले. त्यामुळे तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे आणि तिचा प्रत्येक चाहता तिला पुन:पुन्हा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असतो. पण मागील काही वर्षांत तिचे खूपच कमी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. यामागे खूप काही शिजत होते याची आपण कल्पनाही नाही करू शकत. आणि आता यामागील खरे कारण स्वतः सोनालीने सर्वांसमोर आणले आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या कामाबद्दल सांगितले. तसेच मध्यांतरी तिचा खडतर काळ सुरु असताना तिने कशी पाऊलं उचलली, तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि याचा परिणाम इतका होता की तिच्यावर अक्षरशः सिनेसृष्टी सोडण्याची वेळ का आली अश्या अनेक धक्कादायक गोष्टींवर सोनालीने स्पष्टपणे भाष्य केले. तेव्हा ती म्हणाली की, “ज्यावेळी मी लोकांना नाही म्हणायला सुरुवात केली, त्यावेळी माझ्या आयुष्यात अडचणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्या लोकांनी मला कसा त्रास होईल याची योग्य काळजी घेतली. कारण, ते त्या पोझिशनवर होते. त्यांनी त्या पोझिशनचा गैरवापर केला, इतरांवर दबाव टाकला. आता मी विचार करते की, त्यावेळी ते सिनेमे केले असते तर फारसा फरक पडला नसता. पण मला त्या भूमिका करायच्या नव्हत्या.”
तसेच सोनाली पुढे म्हणाली की, “असे काही लोक असतात ज्यांना असं वाटतं की, आपण अशा जागी आहोत जेथे अभिनेत्री आपल्यासाठी ही गोष्ट करेल. पण, मी त्या गोष्टींना नकार दिला म्हणून त्यांनी पुरेपूर काळजी घेतली की मी कशा प्रकारे त्या प्रोडक्शन आणि त्या चॅनेलबरोबर काम करणार नाही. मला कुणी काम देणार नाही. मला सेटवर एकटं पाडण्यात येत होतं. माझं मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं. मला माझ्याच गाण्यावर नाचल्याबद्दल रॉयल्टी मागण्यात येत होती ‘अप्सरा आली’वर डान्स केला म्हणून मला रॉयल्टी पाठवा असे मेल यायचे. इतके इतके पैसे भरा वगैरे. ते फार घाबरवणारं होतं. खूप अनपेक्षित होतं.”
तर सिनेसृष्टी सोडण्याची वेळ का आली यावर बोलताना ती म्हणाली की, “माझ्या या परिस्थितीमध्ये मला कोणताच पर्याय सापडत नव्हता. पण मी एका गोष्टीचा काळजी घेतली की, मी माझी तत्त्व आणि विचार कुठेही मागे सोडणार नाही. मी माझा वेगळा प्रवास सुरु केला. वेगळ्या मार्गाने स्ट्रगल सुरु केला. मी तेव्हा काही गोष्टींना नकार दिला होता, त्यामुळे मला ज्या चित्रपटांमध्ये काम करायचं होतं, त्या चित्रपटांमध्ये काम करता आलं नाही. पण त्यावेळी मी स्वत:चा मार्ग शोधला. दिग्दर्शकांना भेटले, निर्मात्यांना भेटले. हिरकणी चित्रपटात मी आधी स्वत:चे पैसे गुंतवले. पण मी जर असं नसतं केलं तर मला सिनेसृष्टी सोडावी लागली असती.”
पण आता सोनाली पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसल्यामुळे तिचे चाहते प्रचंड खुश आहेत. सोनालीचा ताराराणी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच आता नुकतीच ती एका मल्याळम सिनेमात देखील झळकली.