या बायोपिकमध्ये ‘प्रसाद ओक आणिअमृता खानविलकर’एकत्र झळकणार :
सिनेमातील भूमिकेला पूर्णतः साजेसा अभिनय करून रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर हुबेहूब पात्र आणून ठेवणारा अभिनेता म्हणजे ‘प्रसाद ओक.’
अभिनयासोबतच प्रसादने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. त्याने आजवर अनेक सिनेमे दिग्दर्शित केले. त्यामुळे त्याच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या सिनेमांतून प्रसादचे दिग्दर्शनातील कौशल्य दिसून येते. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो असो वा प्रसादचे येणारे नवनवीन सिनेमे किंवा त्याची त्याच्या चाहत्यांसोबातचे खास क्षण या सर्व कारणांमुळे प्रसाद नेहमीच चर्चेत असतो.
आता नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा प्रसादच्या चर्चांना उधाण आले आहे. त्याचे कारण म्हणजे प्रसादने शेअर केलेली नवी पोस्ट. प्रसादने इंस्टाग्रामवरून नुकतेच त्याच्या आगामी सिनेमाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर आधारित ‘पठ्ठे बापूराव’ या सिनेमाची घोषणा झाली. शाहीर परंपरेतील या अजरामर व्यक्तिमत्त्वाची जीवनसरणी आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
View this post on Instagram
गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या अशा विपुल लावण्या रचणारे महाराष्ट्राच्या शाहिरी बाण्यातील लोकप्रिय नाव श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर म्हणजेच पठ्ठे बापूराव यांनी त्यांच्या प्रवासात खूप संघर्ष केला. हाच संघर्ष आजच्या पिढीसमोर यावा म्हणून प्रसादच्या दिग्दर्शनासोबत आबा गायकवाड यांनी सिनेमाचे लेखन केले. पोस्ट शेअर करत प्रसादने लिहिले की, “अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणून माझी नवी कलाकृती! आशीर्वाद असू द्या मायबापहो! नवनव्या कवनांचा रोज नवा डाव, लेखणीनं घेतला काळजाचा ठाव, जगताना सोसले अनेक घाव शाहिरी परंपरेतलं अजरामर नाव, कलारत्न पठ्ठे बापूराव.”
पठ्ठे बापूराव या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसाद स्वतः करणार असून या सिनेमातील पठ्ठे बापूराव या मुख्य भूमिकेत देखील तोच झळकणार आहे. त्यामुळे दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना स्वतः अभिनय करून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ताबा कसा मिळवणार हे पाहणे उत्सुकतेचे आहे. प्रदर्शित झालेल्या या पोस्टरनुसार पठ्ठे बापूराव या सिनेमात प्रसादसह अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर देखील ‘पवळा’ ही मुख्य भूमिका साकारणार आहे.
त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष वेधले आहे.