झी मराठी वाहिनीने यावेळी संगीत, डान्स यापेक्षा वेगळा आणि हटके शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आणला तो शो म्हणजे ‘जाऊ बाई गावात.’ या शो चा प्रोमो जेव्हापासून प्रदर्शित झाला तेव्हापासूनच या शोसाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक होते. या बहुचर्चित शोचा रविवारी (११ फेब्रुवारी रोजी) महाअंतिम सोहळा पार पडला. ३ महिन्यांनंतर या शोला पहिल्या पर्वाची विजेती मिळाली.
या शोमध्ये एकूण १२ मुलींनी भाग घेतला होता. त्यातील ५ मुली महाअंतिम सोहळ्यापर्यंत पोहोचल्या. शहरातील मुलींना गावाकडील दैनंदिन जीवनातील निरनिराळी कामांच्या मोहिमा दिल्या गेल्या. गावाच्या मातीत तिथलं होऊन कामगिरी फत्ते करत या मुलींनी शोच्या महाअंतिम सोहळ्याची पायरी चढली. मनोरंजन आणि विविध मोहिमांनी भरलेल्या त्याचबरोबर अस्सल मराठी मातीतला आणि गावाशी नाळ जोडलेला जाऊ बाई गावात या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी गावकऱ्यांची मनं जिंकली.
जाऊ बाई गावातच्या अंतिम सोहळ्यासाठी खास पाहुणे म्हणून महेश मांजरेकर, आदेश बांदेकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी विशेष हजेरी लावली. रमशा फारुकी, रसिका ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या जाऊ बाई गावातच्या पहिल्या पर्वाच्या टॉप ५ स्पर्धक होत्या. जाऊ बाई गावातच्या ट्रॉफीवर नाव कोरत रमशाने विजेतेपदाचा मान पटकावला. तर अंकिता मेस्त्री ही या शोच्या पहिल्या पर्वाची उपविजेती ठरली.
विजयावर नाव कोरल्यावर रमशाला २० लाखांचा धनादेश आणि मानाची ट्रॉफी देण्यात आली. या पर्वाची विजेती ठरल्यानंतर रमशाने तिचे मनोगत व्यक्त केले, तेव्हा ती म्हणाली की, “Oh My God! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि जाऊ बाई गावातच्या पहिल्या पर्वातली विजेती आहे ‘रमशा’. तेव्हा मला वाटलं की मी स्वप्न पाहत आहे. कारण, गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरी ने इससे मुझे मिलाने की साज़िश की है..”
View this post on Instagram
तसेच पुढे ती म्हणाली, “मी स्वतःला हेच म्हणाली की, ही फक्त सुरवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं जाऊ बाई गावात ह्या शोला १०० % दिले आहेत, तसंच पुढेही द्यायचं आहे. कारण यशासाठी कुठलाही शॉर्टकट नाही. माझ्या धन्यवादाची लिस्ट खूप मोठी आहे सुरुवात गावकऱ्यांपासून करेन. मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली. थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकतं. जाऊ बाई गावात आणि झी मराठीच्या पूर्ण टीमचे मन:पूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवले आहे की मी गावात एक घर घेणार. मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे.”
यापूर्वी रमशाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ‘रिटा रिपोर्टर’ची भूमिका देखील साकारली होती. तसेच रमशाने काही टीव्ही शो आणि थिएटरमध्ये देखील काम केले आहे. आता सध्या मात्र सर्व स्तरातून तिच्या यशाचे भरभरून कौतुक होत आहे.