समाजातील दाहक वास्तव्य सिनेमाच्या माध्यमातून जगासमोर मांडणाऱ्या काही दिग्दर्शकांपैकी एक म्हणजे लोकप्रिय दिग्दर्शक ‘विवेक अग्निहोत्री.’
‘द काश्मीर फाईल्स’ मागच्या काही महिन्यांत बॉलिवूडमधील सर्वात जास्त वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सिनेमा. मनोरंजन क्षेत्र आणि राजकीय क्षेत्रासह भारतभर या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. पण ही चर्चा सकारात्मक असो वा नकारात्मक, यामुळे या सिनेमाने चांगलीच कमाई केली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींपेक्षा अधिक कमाई करत साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.
द काश्मीर फाईल्समुळे सर्वाधिक चर्चेत आले ते दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री. द ताश्कंद फाईल्स, बुद्धा इन ट्रॅफिक जॅम तसेच आत्ताचा द काश्मीर फाईल्स’ त्यांचे हे सिनेमे प्रचंड गाजले. त्यामुळे ते आता कोणता नवीन सिनेमा घेऊन येणार याकडे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. कारण आता त्यांच्या नव्या सिनेमाची चर्चा सुरू झाली आहे.
प्रसिद्ध कन्नड लेखक, साहित्य अकादमी विजेते साहित्यकार एस. एल. भैरप्पा यांच्या ‘पर्व’ नावाच्या कादंबरीवर विवेक अग्निहोत्री यांचा पुढील सिनेमा असणार आहे. पर्व ही कादंबरी महाभारत आणि महाभारतातील व्यक्तिरेखेवर आधारित आहे. त्यानुसार अग्निहोत्री यांच्या पुढील सिनेमाची निर्मिती महाभारतावर होणार हे नक्की. या सिनेमाची अजूनतरी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसून, येत्या काळात बंगळुरुमध्ये अग्निहोत्री या सिनेमाची लवकरच घोषणा करणार आहेत.
सिनेमाची घोषणा होताना निर्मात्या आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्यासह लेखक प्रकाश बेलावाडी आणि कादंबरीचे लेखक एस. एल. भैरप्पा देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विवेक अग्निहोत्री यांचा हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार आणि यात नेमकं काय दाखवणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आत्तापासूनच शिगेला पोहोचली आहे.