मराठी सिनेसृष्टीतील आतापर्यंत सर्वाधिक गाजलेला सिनेमा म्हणजे ‘सैराट’. हा सिनेमा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला. त्यांच्या सैराट या सिनेमामुळे सिनेसृष्टीत मराठी सिनेमांची मान उंचावली. या सिनेमातील प्रमुख भूमिका म्हणजे आर्ची आणि परश्या. आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू आणि परश्या म्हणजे आकाश ठोसर. या दोघांनीही सैराटमधून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
आकाश आणि रिंकूला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. तेव्हापासून ते प्रसिद्धीच्या झोतात आले ते आलेच. तर आता आकाश लवकरच त्याच्या “घर बंदूक बिरयानी” या नवीन सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन देखील नागराज मंजुळे यांनीच केले आहे. त्यांचा हा सिनेमा येत्या ७ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. एकीकडे त्याच्या या आगामी सिनेमाची चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे त्याच्या लग्नाबद्दलच्या होणाऱ्या चर्चांना उधान आले आहे.
आकाश त्याच्या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अनेक ठिकाणी जाताना दिसत आहे. तसेच अनेक मुलाखती देताना देखील दिसत आहे. तर एका मुलाखती दरम्यान सिनेमाच्या नावावरून त्याला विचारण्यात आले की, “तुला स्वयंपाक बनवता येतो का?” यावर उत्तर देत तो त्याच्या स्वयंपाक आणि स्वयंपाकघराशी असलेल्या आठवणी देखील मोकळेपणाने सांगतो की, ” मला स्वतःला स्वयंपाक खूप छान बनवता येतो. कारण मी पाच वर्ष तालीम राहिलो आहे. त्या ठिकाणी तु्म्हाला तुमचे जेवण हे स्वत:लाच बनवायला लागतं. त्यामुळे आम्ही प्रत्येकजण स्वत:चे जेवण स्वत: बनवायचो. त्यामुळे मी पोळी, भाजी, बिरयानी असा सर्व स्वयंपाक खूप छान बनवू शकतो.”
त्यावरून त्याला लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे असे विचारले तेव्हा आकाश म्हणाला की’ “मला लग्नासाठी अशी मुलगी हवी आहे जिला बिरयानी खूप छान बनवता येईल. मला तिच्याशी लग्न करायला नक्की आवडेल. कारण ज्या मुलीला बिरयानी बनवता येते, तिला कुठलाही स्वयंपाक बनवता येऊ शकतो.”
तर आकाशचे चाहते त्याच्या सिनेमासाठी आणि त्याच्या लग्नासाठी खूप उत्सुक आहेत.