हिंदी कलाक्षेत्रातील मालिका विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता ‘अविनाश सचदेव’ आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
‘मैं भी अर्धांगिनी’, ‘छोटी बहू’, ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ : एक बार फिर’, ‘आयुष्मान भव’ आणि ‘करम अपना अपना’ यांसारख्या अनेक हिंदी मालिकेतून अविनाश सचदेव घराघरात पोहोचला आहे. त्याने नुकतीच ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये दमदार एंट्री केली आहे.
मालिकेनंतर अविनाशला बिग बॉसमध्ये पाहून त्याचे चाहते देखील प्रचंड खुश झाले आहेत. तसेच या पर्वात त्याची एक्स गर्लफ्रेंड पलक पुरसवानीसुद्धा सहभागी झाली आहे. त्यामुळे शोची आणखीनच रंजकता वाढली आहे. बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी अविनाशने अनेक मुलाखती दिल्या. या दरम्यान त्याने त्याच्या अनेक खासगी आयुष्य आणि करियरबद्दल भाष्य केले.
मागील काही काळातील त्याचा कठीण काळ कसा गेला आणि त्यावर ही परिस्थिती का ओढावली तसेच या सर्वाचा इतका गंभीर परिणाम झाला की त्याला आज भाडेतत्त्वावर राहावे लागत आहे.यामागचे खरे कारण त्याने सांगितले. तेव्हा अविनाश म्हणाला की, “२०१९ मध्ये मी मुंबईत एक पॅन-आशियाई रेस्टॉरंट सुरू केलं होतं. अभिनयातील करिअरसोबतच मला स्वत:चा बिझनेस करायचा होता.”
त्याचे हे स्वप्न सर्वांसमोर मांडत तो पुढे म्हणाला की, “२०२०मध्ये कोरोना महामारी आली आणि काही महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर मला माझा रेस्टॉरंट बंद कराव लागले. मी कर्ज घेतलं होतं. ते फेडण्यासाठी माझ्यासमोर एकमेव पर्याय होता, तो म्हणजे फ्लॅट विकणं. आता मी भाडेतत्त्वावर एका अपार्टमेंटमध्ये राहतोय. गेल्या दोन वर्षांपासून मी बऱ्याच कठीण काळाचा सामना केला.”
सध्या अविनाशची बिग बॉसमधील कामगिरी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे.